कठुआ भागात हवामान बिघडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण निसर्ग एवढा मोठा विध्वंस घडवेल, याची कोणालाही खात्री नव्हती. कठुआ जिल्ह्यात रविवारी पहाटे अचानक ढगफुटी झाली. पाहता पाहता पाण्याचा लोंढा आजूबाजूच्या भागांना आपल्या सोबत घेऊन गेला. या आपत्तीत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय रेल्वे ट्रॅक, राष्ट्रीय महामार्ग आणि कठुआ पोलीस स्टेशन परिसराचेही नुकसान झाले आहे. कठुआमध्ये तीन ठिकाणी ढगफुटी झाली आहे. यामुळे मोठ्या विध्वंसाची भीती आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.
advertisement
ढगफुटी आणि भूस्खलन
कठुआच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार- शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री राजबागच्या जोड घाटी गावात ही ढगफुटीची घटना घडली. कठुआ पोलीस स्टेशन क्षेत्रातील बगड़ आणि चंगड़ा गावांमध्ये आणि लखनपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील दिलवां-हुटली येथेही भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळेही नुकसानीची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे बहुतेक जलाशयांची पातळी झपाट्याने वाढली असून, उझ नदी धोक्याच्या पातळीजवळ वाहत आहे. अनेक घरे जलमय झाली आहेत. ढगफुटी आणि भूस्खलनामुळे अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. सध्या पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) एक संयुक्त टीम गावात पोहोचली असून, स्थानिक स्वयंसेवकांसह मदतकार्यात गुंतली आहे.
किश्तवाडमध्येही झाली होती ढगफुटी
काही दिवसांपूर्वी किश्तवाड जिल्ह्यातही ढगफुटीमुळे मोठी तबाही झाली होती. किश्तवाडच्या चिशोती भागात गुरुवारी ढगफुटीनंतर अचानक पूर आला होता. ज्या ठिकाणी श्री मचैल यात्रेसाठी चारचाकी वाहने उभी केली जातात आणि अनेक तात्पुरती दुकाने होती, त्याच ठिकाणी ही घटना घडली. एडीसी किश्तवाड यांच्या माहितीनुसार, श्री मचैल यात्रा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस-प्रशासनाव्यतिरिक्त, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि इतर संस्था मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या आहेत. आतापर्यंत सुमारे 60 लोकांचा मृत्यू झाला आहे.