भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आणि अमेरिकी अंतराळ संस्था नासा संयुक्तपणे पृथ्वी निरीक्षण रडार मोहीम सुरू करणार आहेत. या मोहिमेचं नाव एनआयएसएआर असं आहे. हे रडार मिशन हवामानबदलाला तोंड देण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतं, असं सांगण्यात आलं आहे. किंबहुना, या रडार मोहिमेमुळे पृथ्वीवर असलेली जंगलं आणि पाणथळ जागा यांचे अधिक चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं जाऊ शकतं. यामुळे जंगलं आणि पाणथळ जमिनींचा जागतिक कार्बनवर काय परिणाम होतो हे कळेल, हवामानबदल कसा होत आहे, हे स्पष्ट होऊ शकेल. नासाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे, 'अमर उजाला'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
advertisement
झाडं कार्बन शोषून घेऊन खोडांमध्ये साठवतात आणि कार्बन ओल्या जमिनीच्या थरात आढळतो. अशा परिस्थितीत, जंगलतोड झाल्याने आणि ओलावा असलेली जमीन नष्ट झाल्याने पर्यावरणात किती वेगाने कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होत आहे हे एनआयएसएसआर रडारकडून सहज कळेल. या प्रकल्पाशी संबंधित शास्त्रज्ञ पॉल रोसेन म्हणाले, की `एनआयएसएआर प्रकल्पावर बसवण्यात आलेल्या रडार तंत्रज्ञानामुळे पृथ्वीवरची जमीन आणि हिमनद्यांमधले बदल अधिक चांगल्या पद्धतीने ओळखता येऊ शकतात.`
या प्रकल्पाशी निगडित प्रमुख शास्त्रज्ञ अनुप दास म्हणाले, की `जागतिक स्तरावर आपल्याला कार्बन उत्सर्जनाचं खरं कारण काय आहे हे माहिती नाही. अशा परिस्थितीत हा प्रकल्प हे कारण समजून घेण्यास सहायक ठरू शकतो.`
2024च्या सुरुवातीला एनआयएसएआर लाँच केलं जाईल. हवामानबदलाला तोंड देण्यासाठी आपली जंगलं आणि पाणथळ जागा महत्त्वपूर्ण आहेत. एनआयएसएआर हे रडार मिशन पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित केले जाईल. ते दर बारा दिवसांनी संपूर्ण पृथ्वी आणि हिमनद्यांचं विश्लेषण करील. पर्यावरणातल्या कार्बनचं नियमन करण्यासाठी जंगलं आणि पाणथळ जागा किती महत्त्वाच्या आहेत, हे शास्त्रज्ञांना या विश्लेषणातून मिळालेल्या डेटामुळे समजण्यास मदत होईल.