बिहार विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना सोमवारी राजधानी नवी दिल्ली स्फोटाने हादरून गेली. या घटनेत नऊ लोकांचा मृत्यू (संध्याकाळी साडे सातपर्यंत) झाल्याची माहिती कळते आहे. संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन परिसरात स्फोटाचे कानठळ्या बसवणारे आवाज आले. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन परिसरात असलेल्या चार ते पाच गाड्यांना आग लागली. तसेच परिसरात असलेल्या १० ते १५ गाड्यांच्या चिंधड्या उडाल्या. आगीच्या ज्वाळांनी आकाशात धुराचे लोट झाले. ठराविक अंतराने दोन ते तीन स्फोट झाल्याची माहिती आहे.
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन
दिल्ली स्फोटाचे वृत्त आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून सुरक्षेची माहिती घेतली. नरेंद्र मोदी यांनी सुरक्षेच्या दृष्टीने गृह मंत्रालयाला अधिक सूचना केल्या. त्यावर गृहमंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे शाह यांनी मोदींना सांगितल्याचे कळते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही दुपारी बैठक घेतली होती
फरिदाबाद येथे २९०० किलो आरडीएक्सचा साठा सापडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच दुपारी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची 'वर्षा'वर बैठक घेतली होती. मुंबईतील सुरक्षेच्या अनुषंगाने त्यांनी बैठकीत आढावा घेतला होता. आता दिल्लीतील घटनेनंतर पुन्हा एकदा पोलिस यंत्रणांना त्यांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांना पोलीस छावणीचे स्वरुप
दिल्ली येथील लाल किल्ला स्फोटानंतर मुंबई पोलीस एक्शन मोडवर आले असून मुंबईतील हॉटस्पॉट मानले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला आता पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय निर्णय घेत बॉम्बस्फोट आणि दंगल नियंत्रण पथक महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केली आहेत. चर्चगेट, सीएसएमटी, दादर, वांद्रे या महत्त्वाच्या स्थानकांवर झाडाझडती सुरू झाली आहे. दिल्लीच स्पॉटनंतर मुंबई पोलिसांकडून अधिकची खबरदारी घेण्यास सुरुवात झाल्याचे दृश्य सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे.
