भारताची प्राथमिकता: नागरिक आणि ऊर्जा सुरक्षा
या चर्चेनंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली की, क्षेत्रात वाढत असलेला तणाव, निरपराध नागरिकांचा मृत्यू आणि पायाभूत सुविधांचे होत असलेले नुकसान यावर त्यांनी सखोल चिंता व्यक्त केली आहे. मोदींनी स्पष्ट केले की, "भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि कच्च्या तेलासह नैसर्गिक वायूचा विनाअडथळा पुरवठा ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता आहे." भारताने नेहमीच शांतता आणि स्थिरतेचे समर्थन केले असून, हा वाद केवळ मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमातूनच सुटू शकतो, असा पुनरुच्चार मोदींनी केला.
advertisement
'स्ट्रेट ऑफ होर्मुज'चा पेच
सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कारण इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग जवळपास बंद केला आहे. जगातील एकूण तेल आणि वायू पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के पुरवठा याच मार्गावरून होतो. या नाकाबंदीमुळे आणि आखाती देशांमधील तेल प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचा तुटवडा निर्माण झाला असून किमती गगनाला भिडल्या आहेत.
या संकटातून मार्ग काढण्यासाठी भारताने सक्रिय पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींशी संवाद होण्यापूर्वी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेत इराणने भारतीय तेलवाहू जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचं मान्य केलं होतं. यामुळे देशात सुरू झालेली इंधन टंचाई आता काही प्रमाणात कमी होऊ शकते.
