कुठे घडली घटना?
उत्तर बंगळुरूच्या कोथानूर परिसरात एका आयटी दांपत्याने आपलं आयुष्य संपवलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडली.३२ वर्षीय आयटी इंजिनिअरने बेरोजगारीच्या नैराश्यातून गळफास घेतला, तर पतीचा विरह सहन न झाल्याने त्याच्या पत्नीनेही काही मिनिटांतच टोकाचं पाऊल उचललं. तिने इमारतीवरून उडी मारून आयुष्याचा शेवट केला.
भानू चंदर रेड्डी हा तरुण अमेरिकेत मोठ्या पगारावर नोकरीला होता. मात्र, गेल्या वर्षी AI मुळे झालेल्या कर्मचारी कपातीत त्याची नोकरी गेली. त्यानंतर हे दांपत्य भारतात परतलं आणि ८ महिन्यांपूर्वी बंगळुरूमध्ये स्थायिक झालं होतं. भानूची पत्नी शाझिया हिला आयबीएममध्ये नोकरी मिळाली होती, पण भानू मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून नोकरीसाठी वणवण भटकत होता.
advertisement
त्या २० मिनिटांत काळजाचा थरार
बुधवारी सकाळी शाझिया हैदराबादवरून बंगळुरूला परतली. सकाळी ७:३० च्या सुमारास तिने पतीला फोन केला, पतीने बेडरूमचा दरवाजा उघडला नाही. शेवटी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने दरवाजा तोडला, भानूचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तिथे एक नोटीही सापडली. पतीचा मृतदेह पाहून शाझिया पूर्णपणे कोलमडली. पोलीस येण्यापूर्वीच अवघ्या २० मिनिटांत तिने कोणाचेही लक्ष नसताना १८ व्या मजल्याची गॅलरी गाठली आणि तिथून खाली उडी मारली.
बेरोजगारी आणि आरोग्याच्या समस्या
पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटनुसार, भानू चंदर रेड्डी हा गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता. नोकरी सुटल्याचं दुःख, आर्थिक चणचण आणि त्यातच काही आरोग्याच्या तक्रारींमुळे तो खचला होता. नोकरी शोधूनही मिळत नसल्याने त्याचं नैराश्य वाढत गेलं होतं.
कुटुंबाला न सांगता केलं होतं लग्न
तपासात असंही समोर आलं आहे की, तेलंगणाचे असलेल्या या जोडप्याने दोन-अडीच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, त्यांनी आपल्या लग्नाबद्दल मुलीच्या घरच्यांना कोणतीही कल्पना दिली नव्हती. याच कारणावरून ते हैदराबाद सोडून बंगळुरूमध्ये राहायला आले होते. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आयटी क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे तरुणांवर येणाऱ्या मानसिक दबावावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
