इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात एअरपोर्ट रोडवर एक भीषण अपघात घडला. सोमवारी संध्याकाळी शिक्षक नगर परिसरात एका भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने अनेक पादचाऱ्यांना चिरडले. या भीषण अपघातात आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
रस्त्यावर एकच गोंधळ आणि आक्रोश
हा अपघात इतका अचानक आणि भयंकर होता की, काही मिनिटांतच रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की- धडक इतकी जोरदार होती की, मृतदेह रस्त्यावर विखुरले आणि अनेक लोकांचे शरीर अक्षरश: चिरडले गेले. हे दृश्य पाहून लोकांच्या डोळ्यांत भीती आणि संताप दोन्ही दिसत होता. चारी बाजूंनी किंकाळ्यांचा आवाज ऐकू येत होता.
जखमींना रुग्णालयात दाखल
अपघातानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ जखमींना जवळच्या बांठिया रुग्णालय आणि इतर रुग्णालयांमध्ये दाखल केले. पोलीस आणि रुग्णवाहिका पथकही घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. डॉक्टरांच्या मते- काही जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिक लोकांनी ट्रकला घेरले आणि रागाच्या भरात त्याला आग लावली. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
पोलीस बंदोबस्त तैनात
घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासन लोकांना शांत करण्याचा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे.
वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या अपघातामुळे शहराची वाहतूक व्यवस्था आणि अवजड वाहनांवरील नियंत्रणावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. एअरपोर्ट रोडसारख्या व्यस्त भागात जिथे सतत वाहनांची ये-जा सुरू असते तिथे संध्याकाळी मोठ्या ट्रकचे फिरणे ही एक मोठी निष्काळजीपणाची बाब आहे. प्रशासनाने अवजड वाहनांसाठी वेगळी वेळ किंवा पर्यायी मार्ग निश्चित करायला हवेत जेणेकरून भविष्यात अशा भयानक घटना टाळता येतील, असे लोकांचे म्हणणे आहे.