घटना कधी घडली?
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी सुमारे साडेनऊ वाजताच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक दुर्घटना घडली. कालका एक्सप्रेसच्या धडकेत रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या सात ते आठ भाविकांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज कार्तिक पौर्णिमा असल्यामुळे गंगा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी चुनार गंगा घाटावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
advertisement
शॉर्टकट ठरला काळ
रेल्वे स्टेशनच्या जवळून गंगा घाटाकडे जाण्यासाठी शॉर्टकट म्हणून अनेक भाविक रेल्वे ट्रॅक ओलांडत होते. ट्रॅक पार करत असतानाच, अचानक वेगात आलेली काळका एक्सप्रेस आली आणि या भाविकांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रेनच्या धडकेने अनेक भाविक गंभीर जखमी झाले, तर सात ते आठ भाविक ट्रेनखाली चिरडले गेले. त्यांची ट्रेनने कापली जाऊन जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे घटनास्थळी मोठी अफरातफरी आणि गोंधळ निर्माण झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, मृतदेहांचे अक्षरशः तुकडे झाले होते, ज्यामुळे दृश्य हृदय हेलावणारे होते.
चिंधड्या झाल्या ओळख पटवणंही कठीण
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल आणि शासकीय रेल्वे पोलीसचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. जवानांनी रेल्वे ट्रॅकवरून मृतांचे अवयव आणि अवशेष बाजूला केले. अपघातामुळे रेल्वे ट्रॅकवर मृतदेहांचे झालेले तुकडे पोलिसांनी समूहित केले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे चुनार रेल्वे स्टेशन परिसरात आणि गंगा घाटावर शोकाकुल आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवित्र कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही दुर्घटना घडल्याने भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
रेल्वे रुळ क्रॉस करु नका, पोलिसांचं आवाहन
रेल्वे प्रशासनाच्या वतीने या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे ट्रॅक ओलांडणे हे कायदेशीररित्या गुन्हा असूनही, भाविकांनी मोठी गर्दी असताना आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एक किंवा फूट ओव्हर ब्रिजचा वापर न करता ट्रॅकवरून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. रेल्वे पोलिसांनी स्थानिक नागरिकांना आणि भाविकांना रेल्वे ट्रॅक ओलांडणे किती धोकादायक आहे, याबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.
