इंफाळ/बिष्णुपूर : मणिपूरमधील बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी असम रायफल्सच्या जवानांवर गोळीबार केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाले आहेत.
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, हा हल्ला संध्याकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास झाला. असम रायफल्सच्या 33व्या बटालियनचा ताफा इंफाळहून राष्ट्रीय महामार्ग-2 मार्गे बिष्णुपूरकडे जात असताना नांबोल सबल लैकाई परिसरात अज्ञात दहशतवाद्यांनी घात लावून हल्ला केला. गोळीबारात दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जवान गंभीर जखमी झाले.
advertisement
जखमी जवानांना तातडीने रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने स्वीकारलेली नाही. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. घटनेनंतर मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी RIMS रुग्णालयाला भेट देऊन जखमी जवानांची भेट घेतली आणि त्यांच्या उपचारांची माहिती घेतली.