भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपल्या राजीनामा सादर केला. त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी मी भारतीय राज्यघटनेतील कलम 67(अ) नुसार तत्काळ प्रभावाने उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.
advertisement
60 दिवसात होणार उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक
उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यानंतर भारतीय संविधानानुसार, या रिक्त पदासाठी 60 दिवसांच्या आत निवडणूक होणे आवश्यक आहे. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व सदस्य मतदान करतात. मतदानासाठी प्रमाण प्रतिनिधित्व प्रणाली (Proportional Representation) आणि एकल हस्तांतरणीय मत (Single Transferable Vote) पद्धतीचा वापर केला जातो.
कोणाकडे असेल राज्यसभेचा कारभार
संविधानानुसार उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास राज्यसभेचे उपसभापती, राज्यसभेचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतात. सध्या हरिवंश नारायण सिंह (ज्यांची नियुक्ती ऑगस्ट 2022 मध्ये झाली होती) हे राज्यसभेचे उपसभापती असून तेच तात्पुरते कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतील.
जगदीप धनखड यांचा राजीनामा; राष्ट्रपतींना लिहलेले पत्र जसे आहे तसे...
आदरणीय राष्ट्रपती महोदय,
डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आरोग्याच्या कारणास्तव मी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ६७ (अ) अन्वये भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.
माझ्या कार्यकाळात आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सौहार्दपूर्ण सहकार्याबद्दल मी आपल्या – भारताच्या माननीय राष्ट्रपती यांचे मन:पूर्वक आभार मानतो. मी माननीय पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मान्यवरांचेही मन:पूर्वक आभार मानतो. पंतप्रधानांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मला लाभले असून, या काळात मी अनेक गोष्टी शिकल्या.
सर्व माननीय खासदारांकडून मिळालेल्या प्रेम, विश्वास आणि आपुलकीसाठी मी कायम ऋणी राहील. ही भावना माझ्या स्मृतीत सदैव कोरली जाईल. उपराष्ट्रपती या पदावर कार्यरत असताना मला मिळालेल्या अमूल्य अनुभवांसाठी आणि ज्ञानासाठी मी अत्यंत कृतज्ञ आहे. आपल्या महान लोकशाहीत ही एक मोठी संधी होती.
भारताच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचा मी साक्षीदार झालो, ही माझ्यासाठी गौरवाची आणि समाधानाची बाब आहे. आपल्या देशाच्या इतिहासातील या संक्रमणकालीन पर्वात सेवा करण्याची संधी मिळणं, हे माझ्यासाठी खरोखरच सन्मानाचं होतं.
मी या सन्माननीय पदावरून निवृत्त होत असताना, भारताच्या जागतिक पातळीवरील डंका आणि अद्वितीय यशाबद्दल मला अत्यंत अभिमान वाटतो आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझा पूर्ण विश्वास कायम आहे.
आपले मन:पूर्वक आभार मानतो
