> निकाल जाहीर, आता पॉवर गेम ऑन...
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असले, तरी सत्तेचा खरा खेळ आता सुरू झाला आहे. ९० जागांच्या सभागृहात ३० जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमताचा ४६ हा आकडा गाठण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या नगरसेवकांची जुळवाजुळव टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसने कमालीची खबरदारी घेतली असून विजयी नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे.
advertisement
> कोकण भवनमध्ये नोंदणी, अन् नगरसेवक थेट...
निवडणुकीनंतर नगरसेवकांची फोडाफोडी होण्याची भीती लक्षात घेऊन काँग्रेसने तातडीने हालचाली केल्या. सर्व ३० विजयी नगरसेवकांनी कोकण भवन येथे आपली अधिकृत नोंदणी पूर्ण केली. ही प्रक्रिया संपताच या सर्व नगरसेवकांना बसने अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. सत्तेच्या शर्यतीत असलेला घोडेबाजार टाळण्यासाठी आणि नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पक्षाने ही 'फिल्डिंग' लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
बहुमताची गोळाबेरीज, मविआवर मदार?
भिवंडीत सत्ता स्थापन करण्यासाठी ४६ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे. काँग्रेसकडे ३० जागा आहेत, मात्र बहुमतासाठी अद्याप १६ जागांची गरज आहे. यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची मदत घेण्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय नाही. दुसरीकडे, भाजप आणि इतर प्रादेशिक पक्षही सत्तास्थापनेसाठी काय हालचाली करतात, यावर भिवंडीचा नवा महापौर कोणाचा, हे ठरणार आहे.
>> काँग्रेसकडे किती आहे संख्याबळ?
> काँग्रेस ३०
> राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १२
> समाजवादी पार्टी ०६
एकूण (संभाव्य आघाडी) ४८
