कतार हा मध्य पूर्वेतील एक छोटा देश असला तरी परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगानं त्याची स्वत:ची खास अशी ओळख आहे. गेल्या काही वर्षांत कतार हा देश संपूर्ण जगासमोर एक प्रभावी मध्यस्थ म्हणून पुढे आला आहे. कतारचे परस्परप्रतिस्पर्धी आणि जगावर प्रभाव असलेल्या देशांशी चांगले संबंध आहेत. या देशांमध्ये अमेरिका, चीन, रशिया आणि इराणचा समावेश आहे. मध्य पूर्वेतील अमेरिकी परराष्ट्र धोरणात कतारने विशेष भूमिका बजावली आहे.
advertisement
कतारचे भारताशी खूप पूर्वीपासून जवळचे संबंध आहेत. ऊर्जा क्षेत्रात कतार हा भारताचा मोठा मित्र असून, कतारने भारतात अब्जावधी अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यातील आहे. या पूर्वी मोदी यांनी 2016 मध्ये कतार दौरा केला होता. त्यामुळे भारत आणि कतार या दोन देशांदरम्यान मोठे करार होऊ शकतात.
कतारमध्ये आठ लाख 35 हजार भारतीय काम करतात. ही संख्या कतारच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 27 टक्के आहे. भारतीय लोक कतारमध्ये इंजिनिअरिंग, आरोग्य, शिक्षण, बँकिंग, फायनान्स, मीडिया अथवा ब्लू कॉलर क्षेत्रात नोकऱ्या करतात. कतारमध्ये लहान मोठ्या मिळून एकूण 15 हजार भारतीय कंपन्या आहेत. भारतीय कंपन्यांनी कतारमध्ये 450 दशलक्ष अमेरिकी डॉलरची गुंतवणूक केली आहे.
भारत आपल्या गरजेच्या 48 टक्के एलएनजी कतारमधून आयात करतो. तसेच एकूण एलपीजीच्या 29 टक्के आयात कतारमधून होते. याशिवाय विविध प्रकारचे पेट्रोलियम केमिकल, प्लॅस्टिक आणि खतं भारत कतारमधून आयात करतो. तसेच मेटल्स, भाज्या आणि मसाल्यांची भारतातून कतारला निर्यात होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कतारवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. सुषमा स्वराज या कतारचा दौरा करणाऱ्या पहिला परराष्ट्रमंत्री होत्या. पंतप्रधान मोदी जून 2016 मध्ये कतार दौऱ्यावर होते. आज आणि उद्या (14 आणि 15 फेब्रुवारी) हा मोदी यांचा दुसरा कतार दौरा आहे. या पूर्वी नोव्हेंबर 2008 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी कतारचा दौरा केला होता. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अनेक मंत्र्यांनी कतार दौरा केलेला आहे.
कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी 2015 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. त्यांच्यापूर्वी त्यांचे वडील आणि तत्कालीन अमीर यांनी 1999, 2005 आणि 2012 मध्ये भारत दौरा केलेला आहे.
