हा प्रकल्प एमयूटीपी- 3A (Mumbai Urban Transport Project) अंतर्गत राबवण्यात येत असून, कल्याण ते कसारा दरम्यान तिसर्या रेल्वे मार्गाच्या उभारणीला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली होती. हा प्रकल्प दोन टप्प्यांत विभागण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात कल्याण ते आसनगाव आणि दुसर्या टप्प्यात आसनगाव ते कसारा असा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या कल्याण ते आसनगाव दरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे काम मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून सुरू असून, त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
advertisement
या विभागात प्रवाशांची प्रचंड गर्दी असली तरीही लोकल वारंवार उशिरा धावतात किंवा रद्द होतात. याचा फटका दररोज लाखो प्रवाशांना बसत होता. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी कल्याण- कसारा आणि कर्जत मार्गावर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिकांची मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात होती. अखेर 30 डिसेंबर 2025 रोजी कल्याण ते कर्जत दरम्यान दोन अतिरिक्त मार्गिकांना अंतिम मंजुरी देण्यात आली.
या नव्या मार्गिकांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि वेळेवर होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय पनवेल- वसई उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरलाही लवकरच मंजूरी मिळण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने यापूर्वीच एमयूटीपी- 3B हा प्रकल्प तातडीच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये समाविष्ट केला आहे.
