आदिवासींच्या घरांवर हातोडा आणि दगडफेक
आंदोलकांचा सर्वात गंभीर आरोप हा आहे की, अनेक वर्षांपासून उद्यानात वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबांकडे वैध कागदपत्रे असतानाही त्यांच्या घरांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे संतापलेल्या स्थानिकांनी काही दिवसांपूर्वी दगडफेकही केली होती, ज्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली होती. "आमची घरं पाडली, आता आम्ही जायचं कुठे?" असा टाहो येथील आदिवासी बांधव फोडत आहेत.
advertisement
अभिनव नगरात २२५० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम?
केवळ आदिवासीच नाही, तर उद्यानाला लागून असलेल्या 'अभिनव नगर' या उच्चभ्रू वस्तीतील नागरिकही रस्त्यावर उतरले आहेत. वनसंरक्षकांच्या आदेशानुसार त्यांच्या जागेत सुमारे २२५० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक राज सुर्वे आणि रहिवाशांनी केला आहे. या 'मनमानी' कारभारामुळे परिसरात अनिता पाटील यांच्याविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
पर्यटन व्यवसायावर गदा, उपासमारीची वेळ
उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना सेवा देऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिकांच्या वाहनांवरही निर्बंध लादण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. "गाड्यांचे हप्ते कसे भरायचे आणि मुलाबाळांना काय भरवायचे?" असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. या जाचक नियमांमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अधिकाऱ्यांनी ठोकला 'रामराम'!
अनिता पाटील यांच्या कामकाजाच्या पद्धतीला कंटाळून केवळ नागरिकच नाही, तर उद्यानातील कर्मचारीही त्रस्त असल्याचे बोलले जात आहे. काही अधिकाऱ्यांनी वैतागून स्वतःची बदली करून घेतली, तर काहींनी थेट नोकरीचा राजीनामा देऊन 'रामराम' ठोकल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
सरकारने लक्ष द्यावे, अन्यथा...
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी तातडीने लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी राज सुर्वे आणि आंदोलकांनी केली आहे. जर योग्य कारवाई झाली नाही, तर लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
