या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी उपस्थितीमुळे सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते बॉलिवूड अभिनेता सलमान खानने. सार्वजनिक व्यासपीठांवर किंवा वैचारिक चर्चांपासून दूर राहणारा सलमान संघाच्या कार्यक्रमात दिसताच सभागृहात एकच चर्चा रंगली. त्याच्या आगमनानंतर माध्यमांचे कॅमेरे त्याच्याकडे केंद्रित झाले, तर उपस्थित मान्यवर आणि चाहत्यांमध्ये त्याला पाहण्याची उत्सुकता स्पष्टपणे दिसून आली. या व्याख्यानमालेतील हा क्षण अनेकांसाठी अनपेक्षित आणि लक्षवेधी ठरला.
advertisement
या ‘संवाद’ कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील इतरही अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी, अभिनेता रणबीर कपूर, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई तसेच अभिनेत्री अश्विनी भावे यांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष महत्त्व देणारी ठरली. याशिवाय उद्योग, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तीही या कार्यक्रमासाठी नेहरू सेंटरमध्ये एकत्र आल्या होत्या.
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश समाजातील विविध घटकांशी संवाद साधणे आणि राष्ट्रविकासाच्या विषयांवर विचारमंथन करणे हा आहे. वैचारिक चर्चा आणि ग्लॅमर विश्वातील प्रतिनिधी यांचा एकत्रित सहभाग यामुळे या कार्यक्रमाला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले.
या दोन दिवसीय उपक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थितांना मार्गदर्शन करत आहेत. ‘नवे क्षितिज’ या संकल्पनेच्या माध्यमातून संघाची भविष्यातील दिशा, समाजातील एकात्मता आणि राष्ट्रनिर्मितीतील नागरिकांची भूमिका या मुद्द्यांवर ते आपले विचार मांडत आहेत.
