सोन्याच्या दागिन्यांसाठी नाशिककरांना मुंबईकरांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार, युद्ध नव्हे तर हे कारण?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नाशिकच्या ६ हॉलमार्किंग केंद्रे चार महिन्यांपासून बंद असल्याने सराफांना मुंबईला जावे लागत आहे. परिणामी खर्च ५३ रुपयांवरून ४०० रुपयांपर्यंत वाढला आहे.
advertisement
1/7

नाशिकचं सोनं त्याच्या शुद्धतेसाठी देशभर प्रसिद्ध आहे. पण सध्या याच सोन्याची 'शुद्धता' तपासण्यासाठी नाशिकच्या सराफांना मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. शहरातील सर्व ६ हॉलमार्किंग केंद्र गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने एक विचित्र पेच निर्माण झाला आहे. याचा थेट फटका सामान्यांच्या खिशाला बसत असून, ५३ रुपयांत होणारे हॉलमार्किंग आता ४०० रुपयांच्या घरात पोहोचले आहे.
advertisement
2/7
ग्राहकांना शुद्ध सोनं मिळावं यासाठी केंद्र सरकारने हॉलमार्किंग' (HUID) अनिवार्य केलं आहे. नाशिकमध्ये ही सुविधा देणारी सहा केंद्रं दिमतीला होती. मात्र, पर्यावरणाशी संबंधित नियमांची पूर्तता आणि तांत्रिक बदलांच्या कचाट्यात ही सर्व केंद्रं अडकली आहेत. परिणामी, गेल्या चार महिन्यांपासून ही केंद्रं कुलूपबंद आहेत. आता नाशिकचे सराफ दररोज किमान दीड हजार दागिने पार्सलद्वारे मुंबईला पाठवत आहेत.
advertisement
3/7
दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, नाशिकमध्ये हॉलमार्किंग उपलब्ध असताना एका दागिन्यासाठी केवळ ५३ रुपये खर्च येत असे. मात्र, आता हेच दागिने मुंबईला पाठवावे लागत असल्याने वाहतुकीचा खर्च, विम्याचा हप्ता आणि इतर कमिशन यामुळे हा खर्च ३५० ते ४०० रुपयांपर्यंत गेला आहे. हा वाढीव खर्च शेवटी ग्राहकांच्याच पदरात पडत असल्याने सोन्याचे दागिने खरेदी करणे अधिक महाग झाले आहे.
advertisement
4/7
दररोज हजारो दागिन्यांची मुंबई-नाशिक अशी ये-जा पार्सलद्वारे होत आहे. कोट्यवधी रुपयांचे हे सोने रस्त्याने प्रवास करत असताना चोरी किंवा अपघाताचा धोका मोठा असतो. "दागिने मुंबईला पाठवण्यात मोठा धोका आहेच, पण खर्चात झालेली वाढ ही व्यापारी आणि ग्राहक दोघांसाठीही न परवडणारी आहे," असे मत 'इंडियन बुलियन असोसिएशन'चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चेतन राजापुरकर यांनी व्यक्त केले आहे.
advertisement
5/7
आता हॉलमार्किंग केवळ कोडपुरते मर्यादित राहिलेले नाही. नव्या बदलानुसार, प्रत्येक दागिन्यावर सहा अंकी 'HUID' कोड असेलच, पण आता ग्राहकाला 'BIS Care' अ‍ॅपवर त्या दागिन्याचा फोटोही पाहता येणार आहे. हा दागिना कधी बनला आणि कुठे तपासला गेला, याची सर्व माहिती पारदर्शक होणार आहे. याच अत्याधुनिक प्रक्रियेच्या अंमलबजावणीमुळे सध्या केंद्रांचे काम रखडले आहे.
advertisement
6/7
"सरकारचा मूळ हेतू ग्राहकांना शुद्ध सोने मिळवून देणे हा आहे, मात्र केंद्रं बंद असल्याने ग्राहकांची कुचंबणा होत आहे," अशी तक्रार अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे नाशिक अध्यक्ष हिरा जाधव यांनी बीआयएसकडे (BIS) केली आहे.
advertisement
7/7
नाशिक ही सोन्याची मोठी बाजारपेठ असताना इथली हॉलमार्किंग केंद्रं तातडीने सुरू व्हावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे. तोपर्यंत मात्र नाशिककरांच्या दागिन्यांना 'मुंबई वारी' केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नाशिक/
सोन्याच्या दागिन्यांसाठी नाशिककरांना मुंबईकरांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार, युद्ध नव्हे तर हे कारण?