जालना : भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. त्यामुळे निवडणूक म्हणजेच लोकशाहीचा उत्सव भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होतो. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मोठी तयारी केली आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोग सर्वतोपरी काळजी घेत आहे.
40 टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना तसेच 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींसाठी निवडणूक आयोगाने घरपोच मतदानाची खास सोयी केली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे मतदान सुरू देखील झाली आहे. पाहुयात या मतदानासाठी कोण पात्र आहे आणि या मतदानासाठी कोण कोणती प्रक्रिया पार पाडावी लागते. याबाबत आम्ही निवडणूक कर्मचारी संदीप नवगिरे (शिक्षक) यांच्याकडून माहिती जाणून घेतली
advertisement
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने पोस्टल वोटिंगची सुविधा निवडणूक कर्मचाऱ्यांबरोबरच 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वयोवृद्ध व्यक्तींसाठी आणि 40 टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध केली आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना ठरलेल्या केंद्रावर किंवा प्रशिक्षणाच्या ठिकाणी पोस्टल वोटिंगची सुविधा उपलब्ध राहणार आहे मात्र वयोवृद्ध आणि 40 टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्या नागरिकांना घरूनच पोस्टल मतदान करता येणार आहे. यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची एक खास टीम मतदाताच्या थेट घरी येणार आहे त्याचबरोबर या मतदान प्रक्रियेमध्ये गोपनीयतेचा कुठलाही भंग होऊ नये म्हणून या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी देखील करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये चुरशीचा सामना, 3 मतदारसंघात कोणता फॅक्टर महत्त्वाचा?
या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र मतदात्यांनी नमुना 12 डी नावाचा एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर आपलं वयाचं पुरावा आणि 40 पेक्षा अधिक अपंगत्व असल्याचा पुरावा देखील यावेळी मतदात्याला द्यावा लागणार आहे. यानंतर निवडणूक अधिकारी मतदात्याची खात्री करतील आणि मतदानाच्या दिवशी तीन ते चार अधिकाऱ्यांची टीम मतदाताच्या घरी येऊन त्याच्याकडून बॅलेट पेपर वरती मतदान करून घेतील. मतदात्यांनी केलेलं मतदान हे गुप्त पेटी मध्ये टाकण्यात येईल आणि ही बॅग मतदान अधिकारी आपल्या सोबत घेऊन जातील.
ही निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबवली जात नाहीये तर याआधी बिहार राज्यामध्ये कोविड काळामध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा वयोवृद्ध व्यक्तींसाठी ही सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली होती. अनेकांना कोविड-19 विषाणूची लागण झालेली असल्याने तसेच हा विषाणू पसरण्याचा धोका असल्याने देखील या सुविधेचा वापर करण्यात आला होता. घरबसल्या मतदान करण्याच्या या सुविधेमध्ये असलेल्या त्रुटी दुरुस्त करून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पात्र मतदात्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.





