अहमदनगर : नगर जिल्ह्यातील कोपरगावची राजकीय लढाई कशी होणार? पारंपरिक विरोधक असलेले काळे आणी कोल्हे पुन्हा आमने सामने येणार का? अजित पवारांच्या युतीतील समावेशामुळे राजकीय अडचणीत आलेल्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे तुतारी हातात घेणार का? याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
कोपरगाव मतदारसंघात काळे आणी कोल्हे यांची गेल्या पाच दशकांपासून राजकीय लढाई बघायला मिळते. आता स्व. शंकरराव काळे आणी स्व. शंकरराव कोल्हे यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झालेली आहे. कोपरगाव येथील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी अजित पवारांची साथ दिल्याने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची राजकीय अडचण निर्माण झाली आहे. जर पुन्हा त्यांना निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर पक्ष बदलाशिवाय पर्याय दिसत नाही. माझी उमेदवारी निश्चित असून कोल्हेंनी त्यांचा निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रीया आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे
advertisement
मतदारसंघाचा केलेला विकास आणी जनतेशी असलेला जनसंपर्क, या जोरावर पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाणार असून माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास आशुतोष काळे यांनी व्यक्त केलाय.
भाजपात असलेल्या स्नेहलता कोल्हे यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन भाजप सोडू नये यासाठी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कितपत यशस्वी झाला? हे सांगणं कठीण आहे. स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे निवडणूक लढवण्यावर ठाम असून विद्यमान आमदारा विरोधात तुतारी फुंकणार असल्याची चर्चा आहे.
तालुक्याचा विकास आणी जनतेची कामे व्हावी यासाठी कोल्हेंनी आमदार होणं गरजेचं असून भाजपने अगोदर त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. गेल्या 10 वर्षांपासून भाजपात असलेल्या स्नेहलता कोल्हे जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत कोपरगावची जनता असल्याचं त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत.
काही दिवसापूर्वीच विवेक कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती तेव्हापासून कोल्हे कुटुंबीय शरद पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे, असं झालं तर काळे आणि कोल्हे कुटुंबाची पारंपरिक लढत पुन्हा बघायला मिळणार आहे.
