पुणे : माळीण एक अस गाव ज्या गावाने मृत्यू आपल्या डोळ्यांनी पहिला आहे. एका रात्रीत आपले नातलग, जिवलग डोळ्यासमोर नाहीसे झालेले पहिले आहेत. या धक्क्यातुन अद्यापही माळीण गाव सावरलेलं नाही. माळीण गाव परत उभं राहिलंय परंतु 10 वर्षापूर्वीच्या घटनाक्रमाने अजुनही या गावात सण साजरे होतं नाहीत. दहा वर्षांपूर्वी डोंगर कोसळून संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या स्मृती अद्यापही ताज्या असतानाच दरड कोसळण्याची भिती उराशी बाळगून पुनर्वसनाची वाट पाहत जीवन व्यथीत करणाऱ्या माळीणच्या पसारवाडी आणि उंडेवाडी या वाड्यांमध्ये यंदाची दिवाळी साजरी करण्यात आली.
advertisement
दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी, शहरवासीयांप्रमाणे त्यांनाही हा दीपोत्सव उत्साहाने साजरा करता यावा, यासाठी पुण्यातील 'दुर्गम प्रतिष्ठान' संस्थेच्या वतीने डिंभे धरणाच्या कुशीत वसलेल्या पसारवाडी, उंडेवाडी या दुर्गम गावातील 30 आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ, दोन महिन्याचा किराणा आणि नवीन कपडे असे साहित्य दिवाळी भेट देण्यात आले. यावेळी हे ग्रामस्थ्यांना अगदी गहिवरून आलं.
30 जुलै 2014 रोजी माळीण गावात दरड कोसळून 151 नागरिकांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र माळीणची दुर्घटना आजही अनेकांच्या काळजाचा थरकाप उडवतेय. 10 वर्षात सणवार साजरे करण्याची इच्छाच झाली नसल्याचं ग्रामस्थानी म्हटलं परंतु पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठानने दिवाळी साजरी करण्यासाठी आम्हाला मदत केली असून आमच्या पिढ्यानी अशी दिवाळी अनुभवली नाही, अशी भावूक प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांकडून देण्यात आली.
यावेळी गावातील महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या नेसून लेझिम खेळली तसेच गावातील प्रत्येक घरात पताके आणि आकाशकंदील लावण्यात आले. तसेच दारापुढे रांगोळ्या देखील काढण्यात आल्या. हृदय हेलावून टाकणाऱ्या या माळीण दुर्घटनेला जरी 1 दशक उलटले असले तरी आठवणी आज देखील ग्रामस्थ्यांच्या डोळ्यात दिसता. आजची त्या गावात मदतीची नितांत गरज आहे. अजूनही ग्रामस्थ्यांच्या भेदरलेल्या नजरा या प्रसंगाची आठवण करून देत असतात.