एसआरएच्या माध्यमातून एकूण 2777 झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 1249 कुटुंबांना हक्काची घरे मिळाली आहेत, तर उर्वरित 1528 कुटुंबांचे पुनर्वसन काम सध्या सुरू आहे. यामुळे या प्रभागातील झोपडपट्ट्यांचा हळूहळू विकास होत असून, लोकांचे जीवनमान सुधारले आहे.
या प्रकल्पांतर्गत यशवंत नगर, आंबेडकर नगर, विठ्ठलनगर, राजीव गांधी वसाहत, साईनाथ नगर आणि खराळवाडीतील भारतमाता नगर यांसारख्या भागांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जात आहे. विशेष म्हणजे राजीव गांधी वसाहत, आंबेडकर नगर आणि भारतमाता नगरमधील नागरिकांना 300 चौ. फुट क्षेत्रफळ असलेली आणि सर्व अत्याधुनिक सुविधा असलेली घरे दिली गेली आहेत.
advertisement
नवीन घरे पूर्णपणे सुरक्षित आणि आधुनिक असून यामध्ये पाणी, वीज, स्वच्छतागृहे, पक्के रस्ते, लिफ्ट, सोलर प्रकल्प, कचरा व्यवस्थापन, सीएनजी गॅस, सुरक्षा व्यवस्था तसेच अंगणवाडी यांसारख्या सुविधा आहेत. यामुळे पावसाळ्यातील गळती, अस्वच्छता आणि आरोग्याचे धोके मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत.
नवीन घरांमध्ये रहिवास करणाऱ्या कुटुंबांना मुलांच्या शिक्षणासाठी योग्य वातावरण तसेच महिलांच्या आरोग्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध झाली आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर अखेर आम्हाला सुरक्षित छप्पर मिळाले आहे. मुलांसाठी अभ्यासाची योग्य सोय आणि महिलांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध झाले असे नव्याने घर मिळालेल्या कुटुंबांनी आनंद व्यक्त केला.
विठ्ठलनगरमधील रहिवाशांना तात्पुरते नेहरूनगर येथील एच.ए. मैदानावर स्थलांतरित करून त्यांचे पुनर्वसन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक 9 झोपडपट्टीमुक्तीच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा पार करत असून, येथील रहिवाशांचे जीवनमान सुधारण्यास मोठा आधार मिळाला आहे.