सिलिंडर तुटवड्याचा फटका मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनलाही बसला आहे. सिलेंडरचा पुरवठा झाला नाही तर लवकरच कँटिन बंद होणार आहे. विधान भवनातील कँटीनला गॅस सिलिंडर टंचाईचाही फटका बसला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे आता हिंजवडी आयटी पार्क मधील बड्या कंपन्यांनाही झळा बसू लागल्या आहेत. गॅस पुरवठ्यात खंड पडल्याने एका नामांकित कंपनीच्या फूड कोर्ट आणि कॅफेटेरियामधील अन्नपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून, कंपनीने कर्मचाऱ्यांना चक्क घरून डबा आणण्याचा सल्ला दिला आहे. असे मेल ही कर्मचाऱ्यांना कंपनीने पाठविले आहेत.
advertisement
वर्क फ्रॉम होमची मागणी
गॅसअभावी कॅम्पसमध्ये नियमित स्वयंपाक करणे कठीण झाल्याने फूड कोर्टमध्ये सध्या मर्यादित पदार्थ उपलब्ध आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी कंपनी बाहेरील किचनमधून जेवण मागवण्याचे प्रयत्न करत आहेत. कार्यालयीन कार्यक्रम किंवा मीटिंगसाठी दिल्या जाणाऱ्या केटरिंग सेवा सध्या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. रिटर्न टू ऑफिसमुळे हजारो कर्मचारी कार्यालयात येत आहेत. अशा वेळी खाण्यापिण्याची आबाळ होत असल्याने, विशेषतः अविवाहित आणि परराज्यातील कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. दरम्यान मोठ्या कॅम्पसमध्ये हजारो लोकांसाठी अन्नाची सोय करणे कठीण झाले आहे. जोपर्यंत गॅस पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्यावे, अशी मागणी फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज (FITE) कडून करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
शहरातील हॉटेल व्यवसायापाठोपाठ आता आयटी क्षेत्रालाही या टंचाईचा फटका बसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुरवठा कधी सुरळीत होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घरगुती गॅसच्या दरात व पुरवठ्याच्या कालावधीतही वाढ करण्यात आली आहे. तसेच ज्या ग्राहकांनी केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांना गॅस सिलेंडर देण्यात येत नसल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे कमर्शियल गॅसचा पुरवठा तर यापूर्वीच बंद करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांसह अनेक लघुउद्योजक अडचणीत आले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वी घरपोच मिळणाऱ्या गॅससाठी आता ग्राहकांना भर उन्हात गॅस एजन्सीसमोर तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीही व्यक्त होत आहे.
