पुणे : राज्यात पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील करण्यात येतं आहे. पुणे, मुंबई, कोकण, सातारा आणि कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यभर पुढील 24 तासात पावसाची काय परिस्थिती असेल याचा आढावा घेऊया.
advertisement
मुंबईत काल रात्रभर झालेल्या पावसामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा, विमान सेवा आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांची गैरसोय झाली असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. याचपार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत 26 जुलैला 32 अंश सेल्सिअस कमाल तर 22अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
पुण्यात पावसामुळे अतोनात नुकसान, आम्ही जगायचं कसं? नागरिकांंनी फोडला टाहो, भयंकर परिस्थिती
पुण्यात पुढील काही तासांत पुण्यात पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पुणे शहरासह परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वातीने करण्यात येतंय. 26 जुलैला देखील पुण्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून 30 अंश सेल्सिअस कमाल तर 21अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
कोल्हापुरात पंचगंगेने आपली धोका पातळी ओलांडली असून सध्या पंचगंगा 43 फूट 2 इंचावरून वाहत आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे यंत्रणादेखील अलर्ट झाली असून ज्या भागात पुराच्या पाण्याचा शिरकाव होतो त्या भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहेत. तर कोल्हापूर मध्ये 26 जुलैला 30अंश सेल्सिअसकमाल तर 22अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत असून बीड, छ. संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात पुढील 2 दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यतावर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली आहे.तर छ. संभाजीनगरमध्ये 34अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपुर, अमरावती, चंद्रपुर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ भंडारा, गोंदिया, वाशिम, गढ़चिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस सुरु आहे.तर नागपूर मध्ये 26 जुलैला 35 अंश सेल्सिअस कमाल तर 22अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल.
राज्यभर पावसाचा जोर वाढला असून काही जिल्ह्यांमध्ये जीवितहानीच्या घटना घडल्या आहेत. तर काही भागात येणाऱ्या 24 तासात प्रचंड पावसाचा इशारा देण्यात आला. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येतंय.





