अशी झाली अटक
अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जाधव (वय ५२, रा. जळकोट, लातूर) आणि अमोल बाबूगिरी (वय ३२, रा. अहमदपूर) यांचा समावेश आहे. दिलीप स्वामी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अपहरण आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. हडपसर भाजी मंडई परिसरात हे दोघे संशयास्पद रित्या वावरत असल्याची माहिती पोलीस हवालदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांना मिळाली. तपासणीत त्यांच्या खिशात दोन पिवळ्या धातूची बिस्कीटं आणि बनावट साखळी सापडली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिताफीने दोघांना ताब्यात घेतले.
advertisement
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी २४ जुलै रोजी कसबा पेठेतील लाल महाल परिसरात एका ज्येष्ठ महिलेला स्वस्तात सोन्याचे बिस्किट देण्याचे आमिष दाखवून तिचे दागिने या टोळीने लांबवले होते. तसेच सातारा जिल्ह्यातील कराडमध्येही एका महिलेचे मंगळसूत्र अशाच पद्धतीने लंपास केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यांच्या झडतीत पोलिसांना पिवळ्या धातूची दोन बिस्किटे आणि बनावट सोन्याची साखळी सापडली आहे.
भररस्त्यात गाठून "आमच्याकडे सोन्याचे बिस्किट आहे, ते स्वस्तात देतो," असे सांगून ही टोळी महिलांचा विश्वास संपादन करायची आणि त्यांचे खरे दागिने घेऊन पोबारा करायची. या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
