नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुणाल विलास पालवे (वय २७) हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना दुसऱ्या एका दुचाकीशी त्यांचा अपघात झाला. यावेळी तिथे कारमधून आलेल्या बाबू पाटील आणि त्याच्या साथीदारांनी मध्यस्थी करत 'तुझीच चूक आहे' असे म्हणत कुणाल यांच्याशी हुज्जत घातली. वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि मारहाणीत झाले.
आरोपी बाबू पाटील याने कुणाल यांचा गळा आवळून धरला, तर त्याच्या इतर साथीदारांनी आपल्या कमरेचा बेल्ट काढून कुणाल यांच्या डोक्यावर आणि तोंडावर जीवघेणे प्रहार केले. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. जखमी कुणाल यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे.
advertisement
काळेवाडी पोलिसांनी याप्रकरणी बाबू पाटील, अभिषेक माडगुळे, विकी सुतार आणि त्यांच्या एका साथीदारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ कारणावरून तरुणाच्या जीवावर उठणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. कोंढव्यातूनही नुकतीच अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात रिक्षा वळवण्यावरून झालेल्या वादातून रिक्षा चालकावर चक्क गोळीबार करण्यात आला होता. या घटनांनी पुण्यात खळबळ उडवली आहे.
