नेमकी घटना काय?
अहिला ऊर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), सार्थक राजू जाधव (वय ५) आणि गौरी राजू जाधव (४ महिने) अशी मृत्युमुखी पडलेल्या आई आणि मुलांची नावे आहेत. हे कुटुंब मूळचे बुलढाणा जिल्हयातील लोणार येथील असून सध्या पाबळ येथील थोर स्थळ वस्ती येथे वास्तव्यास होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पती राजू जाधव याच्याशी भाग्यश्री यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. यानंतर त्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या. दुपारी दोनच्या सुमारास शोध घेत असताना परमेश्वर पिंगळे यांच्या विहिरीत ४ महिन्यांच्या चिमुरडीचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यानंतर आई आणि मुलाचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला.
advertisement
संशयाचे भूत ठरले जीवघेणे
भाग्यश्री यांची बहीण जयश्री सुनील जाधव यांनी याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती राजू जाधव हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तपासाची चक्रे फिरली
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. कौटुंबिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
