कुणाल चोरडिया (२५, रा. चिंचवडगाव), मयुरेश पाडाळे (२३, रा. म्हाळुंगे) आणि सिद्धांत आल्हाट (२१, रा. थेरगाव) अशी मृतांची नावे आहेत. २७ तारखेला हे तीन तरुण फॉर्च्यूनर कारमधून उत्तर भारताच्या सहलीवर गेले होते. परतीच्या प्रवासात राजस्थानमधील केथून पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.
या सहलीत एक धक्कादायक योगायोग समोर आला आहे. ज्या कारचा अपघात झाला, त्यात चौथा मित्रही होता. मात्र, मंगळवारी त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो विमानाने तातडीने घरी परतला. बुधवारी सकाळी आपल्या जिवलग मित्रांच्या मृत्यूची बातमी समजताच त्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वी हे तरुण लेह-लडाखमध्ये प्रचंड बर्फवृष्टीमुळे अडकले होते. पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांच्या मध्यस्थीने आणि BSF च्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली होती. मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडलेले हे तरुण घराच्या ओढीने परतत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
घरी गुढी उभारण्याची तयारी सुरू असतानाच या तरुणांच्या निधनाची बातमी धडकल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
