काय आहे कुष्मांडा देवीची महती ?
ज्यावेळी ब्रह्मांडाचे अस्तित्व नव्हते, सर्वत्र अंधःकार होता, तेव्हा आपल्या ईश्वरी हास्यातून तिने ब्रह्मांडाची रचना केली. अर्थातच हीच ब्रह्मांडाची आदिशक्ती असून हिचा निवास सूर्यलोकात आहे. सूर्यलोकात निवास करण्याची क्षमता आणि सामर्थ्य केवळ हिच्यातच आहे. तिच्या शरीराचे तेज आणि कांती सूर्यासाखी तेजस्वी, दैदीप्यमान आहे आणि यांची बरोबरी कोणताही देव किंवा देवी करू शकत नाही. तिच्या तेज आणि प्रकाशामुळे दाही दिशा प्रकाशित होत आहेत. ब्रम्हांडातील सर्व सजीवांमध्ये आणि निर्जीवांमध्ये तिचेच तेज आणि चैतन्य भरून राहिलेले आहे, अशी महती श्रीपुजक किशोर मुनीश्र्वर यांनी सांगितली.
advertisement
नवरात्रीची तिसरी माळ! अंबाबाईची कामाक्षी देवी स्वरुपात पूजा, विलोभनीय रूपाचा पाहा Video
अशी बांधण्यात आली आहे पूजा..
श्री कुष्मांडा देवी ही अष्टभुजादेवी म्हणूनही प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातांमध्ये क्रमशः कमंडलू धनुष्य, बाण, कमळ, अमृतकलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातामध्ये सर्व सिद्धि आणि धनसंपत्ती देणारी जपमाळ आहे. तिचे वाहन सिंह आहे. संस्कृत भाषेत कोहळ्याला कूष्मांड असे म्हणतात. कूष्मांड तिला विशेष आवडतो म्हणूनच नवचंडी, शतचंडी इ. होमहवनांत कोहळ्याचे समर्पण असते. त्यामुळेच तिला कूष्मांडा म्हणतात. ही पूजा आनंद मुनीश्वर, किरण मुनीश्वर, चैतन्य मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर या श्री पुजकांनी बांधली आहे.
नवरात्राच्या चतुर्थीला कूष्मांडादेवीची उपासना केली जाते. यादिवशी साधकाचे मन अनाहत चक्रामध्ये स्थिर झालेले असते. त्यामुळे यादिवशी तिचे रूप लक्षात ठेवून अत्यंत पवित्र व स्थिर मनाने कुष्मांडादेवीची पूजा व उपासना केली पाहिजे. तिच्या उपासनेने भक्तांचे सर्व रोग, शोक नष्ट होतात. तिच्या भक्तीने आयुष्य, यश, वळ आणि आरोग्य यांची वृद्धी होते. कुष्मांडादेवी अत्यल्प सेवा आणि भक्तीने प्रसन्न होणारी आहे. मनुष्य जर प्रामाणिक अंतःकरणाने तिला शरण गेला तर त्याला सहज परम पदाची प्राप्ती होवू शकते, असेही किशोर मुनीश्र्वर यांनी सांगितले.
द्वितीय माळेला अंबाबाईची महागौरी स्वरुपात पूजा; देवीच्या मनोहारी रूपाचा पाहा Video
दरम्यान, श्री कूष्मांडा उपासकाला अल्प काळातच तिच्या कृपेचे सूक्ष्म अनुभव येवू लागतात. या भवसागरातून पार होण्यासाठी तिची उपासना हा सर्वाधिक श्रेयस्कर मार्ग आहे. त्याचबरोबर मनुष्य त्या उपासनेद्वारे आधिव्याधिमुक्त होवून सुखसमृद्धी आणि उन्नतीच्या दिशेने वाटचाल करतो. याप्रमाणे आपल्या ऐहिक आणि पारमार्थिक उन्नतीसाठी तिच्या उपासनेमध्ये सदैव तत्पर राहिले पाहिजे, असे देखील श्री पूजकांनी स्पष्ट केले आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)