घरात पंचमुखी हनुमानाची मूर्ती ठेवावी की नाही?
रसराजजी महाराजांनी पॉडकास्टमध्ये स्पष्ट केले की, हनुमान हे साक्षात जागृत देव आहेत. "देवाची मूर्ती घरात असणे कधीही अयोग्य किंवा अशुभ असूच शकत नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले. पंचमुखी हनुमान हे शक्ती, संरक्षण आणि विजयाचे प्रतीक आहेत. महाराजांच्या मते जर तुमची श्रद्धा असेल आणि तुम्ही नियमाने पूजा करू शकत असाल, तर पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणे अत्यंत शुभ आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि कुटुंबाचे सर्व वाईट शक्तींपासून रक्षण होते.
advertisement
पंचमुखी अवताराची पौराणिक कथा
हनुमानजींनी पंचमुखी अवतार का घेतला, यामागची कथा महाराजांनी सांगितली आहे. रामायण युद्धाच्या वेळी जेव्हा अहिरावणाने प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना पाताळ लोकात पळवून नेले, तेव्हा त्यांना सोडवण्यासाठी हनुमानाला पाताळात जावे लागे. अहिरावणाने पाच दिशांना पाच दिवे लावले होते आणि ते पाचही दिवे एकाच वेळी विझवले तरच त्याचा वध शक्य होता. हे कठीण कार्य पूर्ण करण्यासाठी हनुमानाने 'पंचमुखी' रूप धारण केले आणि एकाच वेळी पाचही दिवे विझवून अहिरावणाचा अंत केला.
पाच मुखांचे आध्यात्मिक महत्त्व
पंचमुखी हनुमानाचे प्रत्येक मुख एका विशिष्ट दिशेचे आणि शक्तीचे प्रतिनिधित्व करते.
हनुमान मुख (पूर्व): हे मुख वानराचे असून ते इष्ट सिद्धी आणि शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आहे.
नरसिंह मुख (दक्षिण): हे मुख भीती दूर करण्यासाठी आणि संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आहे.
गरुड मुख (पश्चिम): हे मुख सौभाग्य आणि सर्व प्रकारच्या विषांपासून (नकारात्मकता) मुक्ती देते.
वराह मुख (उत्तर): हे मुख समृद्धी, संपत्ती आणि दीर्घायुष्यासाठी पुजले जाते.
हयग्रीव मुख (आकाश): हे घोड्याचे मुख असून ते ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
