साबुदाणा आणि धार्मिक ग्रंथांमधील उल्लेख
प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये साबुदाण्याचा उल्लेख कोठेही आढळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे साबुदाणा हा मूळचा भारतीय पदार्थ नाही. तो कंदमुळापासून बनवला जातो, जो दक्षिण अमेरिकेतून भारतात आला आहे. शास्त्रानुसार उपवासात कंदमुळे चालतात, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या साबुदाणा 'फराळी' ठरतो. परंतु, प्राचीन काळी ऋषीमुनी उपवासात केवळ फळे, दूध किंवा रानटी कंदमुळे खात असत. साबुदाणा हा मानवनिर्मित आणि प्रक्रिया केलेला पदार्थ असल्याने काही कट्टर परंपरावादी लोक तो उपवासात खाणे टाळतात.
advertisement
साबुदाण्याचे पचन आणि आरोग्यावर होणारा परिणाम
शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर साबुदाणा हा 'कार्बोहायड्रेट्स'चा मोठा स्रोत आहे. उपवासाच्या वेळी शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून तो खाल्ला जातो. मात्र, त्यात फायबर किंवा इतर पोषक तत्वे नसतात. साबुदाणा पचायला जड असतो आणि तो खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. आयुर्वेदानुसार, उपवास म्हणजे पचनसंस्थेला विश्रांती देणे. पण साबुदाण्याची खिचडी किंवा तळलेले वडे खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येतो, जो उपवासाच्या नियमांच्या विरुद्ध आहे.
उपवासासाठी सर्वोत्तम पर्याय काय?
जर तुम्हाला खऱ्या अर्थाने उपवासाचे पुण्य आणि आरोग्य लाभ मिळवायचे असतील, तर साबुदाण्याऐवजी इतर नैसर्गिक पदार्थांचा विचार करावा. भगर हे नैसर्गिक धान्य असून पचायला हलके असते. राजगिरा हा प्रथिनांनी समृद्ध असून अत्यंत सात्विक मानला जातो. उपवासात ताजी फळे आणि दूध घेणे हे सर्वात शुद्ध मानले जाते. उद्या 19 मार्च रोजी गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होत आहे. या नऊ दिवसांच्या उपवासात साबुदाण्यावर अतिरेकी ताण देण्यापेक्षा फलाहाराला प्राधान्य देणे अधिक सयुक्तिक ठरेल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
