मॅचच्या 9व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर ओमानचा ओपनर आमिर कलीम याच्या पायावर बॉल लागला, यानंतर भारतीय खेळाडूंनी एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं, पण अंपायरने आऊट दिलं नाही, त्यानंतर कुलदीप यादवने कॅप्टन सूर्यकुमार यादवचा हात धरला आणि त्याला जबरदस्तीने डीआरएस घ्यायला लावला. कुलदीपने सूर्याचे दोन्ही हात पकडले आणि डीआरएस घ्यायचा सिग्नल दिला.
कुलदीप यादवची ही जबरदस्ती भारतीय टीमला महागात पडली, कारण रिप्लेमध्ये ओमानचा बॅटर आऊट नसल्याचं स्पष्ट झालं. याचसोबत टीम इंडियाने एक डीआरएस गमावला. डीआरएस गमावला असला तरी ओव्हरच्या तिसऱ्याच बॉलला कुलदीपने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. जतिंदर सिंग याला कुलदीपने 32 रनवर आऊट केलं.
advertisement
ओमानविरुद्धच्या या सामन्यात भारताकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 56 रन केले, तर अभिषेक शर्माने 253.33 च्या स्ट्राईक रेटने 15 बॉलमध्ये 38 रनची वादळी खेळी केली. अभिषेक शर्माच्या इनिंगमध्ये 5 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. याशिवाय अक्षर पटेलने 13 बॉलमध्ये 26 आणि तिलक वर्माने 18 बॉल 29 रन केले. ओमानकडून शाह फैजल, जितेन रामानंदी आणि आमीर कलीम यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.
टीम इंडिया सुपर-4 मध्ये
टीम इंडियाने आधीच आशिया कपच्या सुपर-4 मध्ये धडक मारली आहे, त्यामुळे ओमानविरुद्धचा हा सामना टीम इंडियासाठी सराव म्हणून पाहिला जात आहे. सुपर-4 मध्ये टीम इंडियाला पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध खेळायचं आहे. सुपर-4 मध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना 21 सप्टेंबरला, बांगलादेशविरुद्ध 24 सप्टेंबरला आणि श्रीलंकेविरुद्ध 26 सप्टेंबरला होणार आहे. सुपर-4 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या 2 टीम 28 सप्टेंबरला आशिया कपच्या फायनलमध्ये खेळतील.