ट्रॉफीवरून संपूर्ण जगासमोर अपमानित झाल्यानंतर आता मोहसिन नक्वीने आशिया कपची ट्रॉफी भारताला द्यायची तयारी दर्शवली आहे, पण यासाठी त्याने भलतीच अट ठेवली आहे. टीम इंडियाला ट्रॉफी देण्यासाठी औपचारिक समारंभ आयोजित करण्याची इच्छा मोहसिन नक्वीने बोलून दाखवली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार नक्वीने त्याची ही अट आशिया कपच्या आयोजकांना कळवली आहे, पण नक्वीची ही अट मान्य व्हायची शक्यता कमी आहे.
advertisement
मोहसिन नक्वी हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आणि पाकिस्तानी राजकारणी आहे. तसंच तो आशियाई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्षही आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान मोहसिन नक्वीने भारताविरोधात गरळ ओकली होती, त्यामुळे भारतीय टीमने त्याच्याकडून ट्रॉफी घ्यायला नकार दिला.
दुबईच्या मैदानात वाद
टीम इंडियाने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार दिल्यानंतर जवळपास तासभर दुबईच्या मैदानात वाद झाला. आशियाई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांसह सूर्यकुमार यादवने चर्चा केली, यानंतर टीम इंडियाने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष खालिद अल अरौनी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्याची तयारी दर्शवली, पण नक्वी याने याला विरोध केला, तसंच ट्रॉफी आपल्याकडूनच घ्यावी लागेल, असा हट्ट धरला.
टीम इंडियाने मात्र काहीही झालं तरी नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं, त्यानंतर नक्वीने आशिया कपची ट्रॉफी मैदानातून बाहेर नेण्याचे आदेश तिथल्या कर्मचाऱ्यांना दिले. आशिया कपची ट्रॉफी सध्या स्टेडियम जवळच असलेल्या एसीसीच्या मुख्यालयात ठेवण्यात आल्याचं वृत्त आहे. नक्वीने ट्रॉफी दिली नाही, तरी भारताने ट्रॉफीशिवाय मैदानात विजयाचं सेलिब्रेशन केलं.