टीम इंडियाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष आणि 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमचे सदस्य संदीप पाटील यांच्यासोबतही गंभीरचे वाद झाले, या वादानंतर गंभीर अजूनही संदीप पाटील यांच्यासोबत बोलत नाही. स्वत: संदीप पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गौतम गंभीरला टीममधून डच्चू दिल्यानंतर त्याच्यासोबत मतभेद झाले. एकेकाळी गंभीरसोबतचे संबंध चांगले होते, पण आता आम्ही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भेटलो तरी तो मला ओळखही देत नाही, आमच्यातले संबंध बिघडले आहेत, असं संदीप पाटील म्हणाले आहेत.
advertisement
द्रविड-लक्ष्मण शांतपणे गेले
'टीम इंडियातून वगळण्यात आल्यानंतर खेळाडू वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. लक्ष्मण, द्रविड, गांगुली यांच्यासारखे खेळाडू शांतपणे निघून गेले, पण गंभीर अजूनही नाराज आहे', असं वक्तव्य संदीप पाटील यांनी केलं आहे.
'गंभीर अजूनही माझ्यावर नाराज आहे, तो माझ्याशी कधीच बोलत नाही. आम्ही न्यूज चॅनलमध्ये एकमेकांच्या बाजूला बसून अनेक कार्यक्रम केले, पण तेव्हा गंभीरने माझ्याकडे पाहिलंही नाही. मी जेव्हा त्याला हॅलो म्हणायचो, तेव्हा मला कोणताही प्रतिसाद मिळायचा नाही. मी अजूनही त्याचा आदर करतो', अशी प्रतिक्रिया संदीप पाटील यांनी दिली आहे.
'गंभीर चांगला माणूस आहे, आम्ही एकत्र टेनिस खेळलो आहोत. आमचे संबंध खूप चांगले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण गंभीर मला दर दोन आठवड्यांनी एकदा फोन करायचा. मला प्रशिक्षकपदावरून काढून टाकण्यात आलं, तेव्हा तो मला फोन करायचा, पण ते ठीक आहे', असं संदीप पाटील म्हणाले.
संदीप पाटील हे 2012 ते 2016 पर्यंत निवड समितीचे अध्यक्ष होते. संदीप पाटील निवड समिती अध्यक्ष असताना टीम इंडियाने संक्रमणाचा टप्पा पाहिला, ज्यात तेंडुलकर, द्रविड, गांगुली यांच्यासारख्या महान खेळाडूंनी निवृत्ती घेतली.
'प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. गौतम त्याच्या कारकिर्दीबद्दल खूप गंभीर होता आणि तो त्याच्या बॅटिंग आणि दृष्टिकोनाबद्दल खूप लक्ष केंद्रित करतो. जेव्हा तुम्ही चांगले करत असता तेव्हा कोणताही क्रिकेटपटू मैदान सोडू इच्छित नाही. कोणताही क्रिकेटपटू वगळला जाऊ इच्छित नाही. वगळल्यानंतर प्रत्येक क्रिकेटपटू वेगळा वाटतो. व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, सौरव गांगुली शांतपणे निघून गेले', असं संदीप पाटील म्हणाले.
