टीम्सनी वेळापत्रकानुसार खेळणे अपेक्षित
पाकिस्तान सरकारने आपल्या टीमला या स्पर्धेत निवडक मॅच खेळण्याचे आदेश दिले आहेत, ही बाब आयसीसीच्या निदर्शनास आली आहे. कोणत्याही जागतिक स्पर्धेत सर्व टीम्सनी वेळापत्रकानुसार खेळणे अपेक्षित असते, मात्र पाकिस्तानची ही भूमिका खेळाच्या मूळ तत्त्वांच्या विरोधात असल्याची भूमिका आयसीसीने मांडली आहे. अद्याप PCB कडून याबद्दल कोणतेही अधिकृत पत्र मिळाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असून, या निर्णयाचा सखोल विचार करण्याचे आवाहन पाकिस्तानला करण्यात आले आहे, असं आयसीसीने म्हटलं आहे.
advertisement
भारताविरुद्धच्या मॅचवर बहिष्कार टाकला, तर...
आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडक पद्धतीने मॅच खेळण्याचा निर्णय जागतिक क्रिकेटच्या अखंडतेला तडा देणारा आहे. खेळाडू आणि जगभरातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांच्या दृष्टीने हा निर्णय योग्य नाही. जर पाकिस्तानने 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारताविरुद्धच्या मॅचवर बहिष्कार टाकला, तर त्याचे दूरगामी परिणाम केवळ त्या मॅचवरच नाही, तर संपूर्ण स्पर्धेच्या रचनेवर होऊ शकतात. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.
वाईट परिणाम होणार
नियमांनुसार, जर पाकिस्तानने भारतासोबतची ही मॅच खेळण्यास नकार दिला, तर त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल. अशा परिस्थितीत पाकिस्तानला 2 पॉइंट्स गमवावे लागतील आणि ही मॅच फॉरफीट मानली जाईल. इतकेच नाही तर, आयसीसीच्या नियमांनुसार पाकिस्तानच्या नेट रन रेटवरही याचा अत्यंत वाईट परिणाम होणार आहे. नियमानुसार, फॉरफीट झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तानने 20 ओव्हर खेळल्या आहेत असं गृहीत धरून त्यांच्या रन रेटची गणना केली जाईल.
सर्वात मोठ्या मॅचवर टांगती तलवार
पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे आता 2026 च्या वर्ल्ड कपमधील सर्वात मोठ्या मॅचवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. जरी पाकिस्तानने स्पर्धेत सहभाग घेण्याचे मान्य केले असले तरी, भारतासोबत न खेळण्याच्या निर्णयामुळे स्पर्धेची रंगत कमी होण्याची शक्यता आहे. आता पीसीबी यावर काय अधिकृत उत्तर देते आणि आयसीसी पुढील काळात कोणती कठोर पावले उचलते, याकडे सर्व क्रीडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
