सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने पराभवाची कबुली देत काही चुका मान्य केल्या. त्याने सांगितले की, सुरुवातीला ताज्या खेळपट्टीवर चेंडू थोडा थांबेल आणि पहिल्या डावात अधिक फिरकी मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र तसे घडले नाही. भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट खेळ केला. आमच्या सर्व खेळाडूंनी या सामन्यात आणि संपूर्ण स्पर्धेत ज्या प्रकारे लढा दिला त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे तो म्हणाला.
advertisement
सामन्यातील एक महत्त्वाचा क्षण म्हणजे सॅमसनचा सोडलेला झेल. कर्णधाराने ही चूक स्वतः मान्य करत सांगितले की, मी मोठी चूक केली. सॅमसनचा झेल सोडला. क्रिकेटमध्ये म्हणतात की झेल जिंकतात सामने, आणि आज मैदानात नशीब आमच्या बाजूने नव्हते. अखेरीस याचीच किंमत आम्हाला मोजावी लागली.
गोलंदाजीबाबतही आमच्या त्रुटी राहिल्या. भारतीय फलंदाज जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी आहेत. त्यांच्या विरोधात थोडीशीही चूक झाली तर चेंडू सरळ सीमारेषेबाहेर जातो. आम्ही काही ठिकाणी योजना नीट राबवू शकलो नाही, असे त्याने म्हटले.
इंग्लंडसाठी या सामन्यात जेकब बेथेलने शानदार खेळी केली. कर्णधाराने त्याचे विशेष कौतुक करत सांगितले की, बेथेल आज अप्रतिम खेळला. भविष्यात तो इंग्लंडसाठी मोठा खेळाडू ठरणार आहे. पहिल्याच चेंडूपासून त्याने आक्रमक खेळ करत आपली क्षमता जगासमोर दाखवली. जरी आम्ही सामना गमावला असलो तरी त्याची खेळी आमच्यासाठी मोठी सकारात्मक बाब आहे.
253 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने अखेरपर्यंत जोरदार प्रयत्न केले. अनेक संघ अशा परिस्थितीत कोसळले असते; मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत लढा दिला. आम्ही कधीही सामना सोडत नाही. आजही आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला, पण दुर्दैवाने निकाल आमच्या विरोधात गेला, असे कर्णधाराने सांगितले.
