विजय मर्चंट ट्रॉफी या प्रतिष्ठित अंडर-16 रेड-बॉल स्पर्धेत 30 टीम सहभागी होत आहेत, पण अमन यादवने इतरांपेक्षा वेगळा ठसा उमटवला आहे. आसामचा कर्णधार असणाऱ्या अमनने 6 सामन्यांमध्ये 5 शतकं झळकावली आहेत. अमनने आतापर्यंत 8 इनिंगमध्ये 749 रन केल्या आहेत, ज्यामुळे तो स्पर्धेत सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे.
प्रत्येक मोठ्या टीमविरुद्ध शतक
advertisement
अमन यादवने जवळजवळ प्रत्येक बलाढ्य टीमविरुद्ध त्याच्या बॅटिंगचं कौशल्य दाखवले आहे. त्याने बंगालविरुद्ध 100 रन केल्या. झारखंडविरुद्ध त्याने 114 रन केल्या. तर केरळविरुद्ध, अमनने पूर्णपणे वर्चस्व गाजवत 173 रनची खेळी केली, ही या हंगामातील त्याची सर्वोच्च खेळी होती. मुंबईसारख्या बलाढ्य टीमविरुद्ध त्याने नाबाद 166 रन काढल्या, तर छत्तीसगडविरुद्धही तो 108 रनवर नाबाद राहिला. क्रिकेट खेळणाऱ्या प्रमुख राज्यांविरुद्ध अमनने ही कामगिरी केल्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली आहे.
कर्णधार म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी
अमन यादव हा केवळ रन मशीन नाही तर जबाबदार कर्णधारही आहे. अमनच्या नेतृत्वात आसामच्या अंडर-16 टीमने विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये एकही सामना गमावलेला नाही. आसाममधून टीम इंडियामध्ये उदयास आलेला रियान पराग देखील अमन यादवच्या खेळाने खूप प्रभावित झाला आहे. रियान परागने सोशल मीडियावर अमनची खेळी शेअर केली आणि त्याला 'भारतीय क्रिकेटचे भविष्य' असे संबोधले.
