भारतासोबत न खेळण्याचा निर्णय आमचा नाही - सलमान अली आगा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मॅचनंतर पत्रकार परिषदेत बोलताना सलमान अली आगा म्हणाला की, "आम्ही वर्ल्ड कप खेळण्यासाठी नक्कीच जाणार आहोत. मात्र भारतासोबत न खेळण्याचा निर्णय आमचा नाही, सर, आणि आम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही. आमचे सरकार आणि आमचे चेअरमन आम्हाला जे काही निर्देश देतील, त्याचे पालन करणे आमचे कर्तव्य आहे." या विधानामुळे मैदानाबाहेरील राजकारण आता पाकिस्तान क्रिकेटवर प्रेशर टाकत असल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानच्या खेळाडूंचं मत देखील विचारात घेतलं गेलं नव्हतं.
advertisement
गंभीर परिणाम भोगावे लागतील - आयसीसी
पाकिस्तानने हा टोकाचा निर्णय घेण्यामागे बांगलादेशचे प्रकरण कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात येण्यास नकार दिल्यानंतर आयसीसीने त्यांना स्पर्धेतून बाहेर काढून त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला होता. या निर्णयाचा निषेध म्हणून आणि बांगलादेशशी एकजूट दाखवण्यासाठी पाकिस्तान सरकारने भारतासोबतची मॅच न खेळण्याचा पवित्रा घेतला आहे. मात्र, आयसीसीने पाकिस्तानला यापूर्वीच इशारा दिला असून अशा प्रकारच्या निवडक सहभागामुळे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं स्पष्ट केलं आहे.
भारताला सहज 2 पाईंट्स मिळतील
दरम्यान, सध्याच्या वेळापत्रकानुसार पाकिस्तानचे सर्व ग्रुप स्टेज मॅचेस श्रीलंकेत होणार आहेत. मात्र, केवळ भारताविरुद्ध न खेळण्याच्या हट्टामुळे क्रिकेट विश्वात मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. पाकिस्तान सरकार आणि पीसीबी आता यावर काय अंतिम भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर पाकिस्तान या मॅचसाठी मैदानात उतरला नाही, तर भारताला सहज 2 पाईंट्स मिळतील आणि पाकिस्तानच्या नेट रन रेटवर त्याचा मोठा परिणाम होईल, ज्यामुळे त्यांची पुढची वाटचाल कठीण होऊ शकते, यात शंका नाही.
