आरसीबीचा चॅम्पियन खेळाडू जितेश शर्मा याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला संघ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज जितेश 2015 पासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाकडून खेळत आहे. आता त्याने विदर्भ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जितेश शर्मा या वर्षी विदर्भ सोडून बडोद्याकडून खेळताना दिसेल.
31 वर्षीय जितेश शर्माने भारतासाठी 9 टी20 सामने खेळले आहेत. तो पांढऱ्या चेंडूच्या स्वरूपाचा एक उत्तम खेळाडू मानला जातो पण जेव्हा लाल चेंडूच्या सामन्यांचा विचार केला जातो तेव्हा तो मागे पडतो. जितेश शर्मा 2024-25मध्ये एकही रणजी ट्रॉफी सामना खेळला नाही. याचे कारण म्हणजे विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकर हा विकेटकीपर आहे. जेव्हा कर्णधार विकेटकीपर असतो तेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये दुसऱ्या विकेटकीपरसाठी जागा मिळवणे कठीण होते. यामुळे त्याला रणजी सामन्यांमध्ये बेंचवर बसावे लागले. .
advertisement
क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, जितेश शर्माचे बडोद्याला जाण्याचे नियोजन गेल्या काही काळापासून सुरू होते. बडोद्याचा कर्णधार कृणाल पंड्याशी असलेल्या त्याच्या चांगल्या संबंधांमुळे ही बदली शक्य झाली. दोघेही या वर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळले. संघातील बदलामुळे जितेशला त्याची प्रथम श्रेणी कारकीर्द पुन्हा रुळावर येईल अशी आशा आहे.
दरम्यान 2015-16 मध्ये विदर्भाकडून पदार्पण करूनही जितेशने फक्त 18 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याची सरासरी 24.48 आणि चार अर्धशतके आहेत. त्याचा शेवटचा रेड बॉल सामना जवळजवळ18 महिन्यांपूर्वी झाला होता.
जितेश शर्माचा प्रथम श्रेणीतील रेकॉर्ड फारसा चांगला नसला तरी तो टी20 फॉरमॅटमध्ये एक उत्तम फिनिशर मानला जातो. त्याने 2023 मध्ये पंजाब किंग्जसाठी अनेक उत्तम खेळी केल्या. त्यानंतर आरसीबीने त्याला त्यांच्या संघात समाविष्ट केले. आयपीएल 2025 मध्ये फिनिशरची भूमिका बजावून जितेश शर्माने आरसीबीला विजेतेपद जिंकण्यात मोठी भूमिका बजावली. रजत पाटीदार जखमी झाला तेव्हा त्याने आरसीबीचे नेतृत्वही केले होते.