भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्माने वर्ल्ड कप 2023 च्या फायनल मॅचबाबत एक मोठा खुलासा केला आहे. ``फायनल मॅचमध्ये टीम इंडिया पराभूत झालीय हे सत्य स्वीकारायला मला दोन ते तीन दिवस लागले होते. माझ्या नेतृत्वाखालील टीमने वर्ल्ड कपमध्ये दमदार खेळी केली होती. सेमी-फायनलपर्यंत भारतीय संघ प्रत्येक मॅच जिंकला होता. पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारतीय टीमला पराभव पत्करावा लागला. हा माझ्यासाठी धक्का होता, असं रोहितने म्हटलं आहे.
advertisement
जगातील सर्वात मोठ्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयसीसी वर्ल्ड कप 2023ची फायनल मॅच झाली होती. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने त्यावेळी टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्याच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण ऑस्ट्रेलियाने भारताला 240 रनांवर रोखलं. या वेळी के. एल. राहुलने 107 बॉल्समध्ये 66 रन बनवले. विराट कोहलीने 63 बॉल्समध्ये 54 रन्स काढले. कॅप्टन रोहित शर्मा 31 बॉल्समध्ये 47 रन करून आउट झाला होता. ऑस्ट्रेलियाने 241 रनांचे लक्ष्य गाठताना दमदार सुरुवात केली. पण भारताने तीन विकेट्स घेत मॅचमध्ये पुनरागमन केले होते. पण ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड ग्राउंडवर पाय रोवून खेळू लागला तेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाला एकतर्फी विजय मिळवून दिला. हेड 120 बॉल्समध्ये 137 रन करून आउट झाला आणि त्याने ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप मिळवून दिला.
याबाबत रोहित शर्माने आदिदास इंडिया`शी बोलताना सांगितले की, ``जेव्हा वर्ल्ड कप फायनल झाल्यावर मी दुसऱ्या दिवशी उठलो, तेव्हा आदल्या रात्री नेमकं काय घडलंय हे मला लक्षात येत नव्हतं. यावर मी माझ्या पत्नीशी चर्चा करत होतो. त्यावेळी म्हणालो की, काल रात्री जे काही घडलं ते एक वाईट स्वप्न होतं. काल फायनल झाली असं मला वाटत नाही. आपण हरलो आहोत, हे सत्य स्वीकारायला मला दोन-तीन दिवस लागले. आता पुन्हा संधीसाठी चार वर्ष वाट पाहावी लागणार आहे.