सचिनला निवृत्ती घेण्यास सांगितलं नव्हतं - संदीप पाटील
संदीप पाटील यांच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात युवराज सिंग, गौतम गंभीर आणि साचिन तेंडुलकर यांसारख्या मोठ्या नावांना संघातून डच्चू देण्यात आला होता. विशेषतः सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीबाबत त्यावेळी झालेली चर्चा आणि निवड समितीची भूमिका यावर पाटील यांनी आता सविस्तर भाष्य केलं आहे. सचिन तेंडुलकरला संघातून वगळलं नव्हतं किंवा त्याला निवृत्ती घेण्यासही सांगितलं नव्हतं, असंही पाटील यांनी स्पष्ट केलंय.
advertisement
संदीप पाटील यांच्यावर प्रचंड टीका
"निवडकर्ते एखाद्या स्टार खेळाडूला संघातून ड्रॉप करू शकतात, पण त्याचं करिअर संपलं आहे असे सांगू शकत नाहीत," असं पाटील म्हणाले. जेव्हा त्यांनी सचिनला त्याच्या भविष्यातील प्लॅन्सबद्दल विचारलं, तेव्हा त्याने खेळ सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि निवड समितीने त्याला होकार दिला होता; त्यानंतर सचिनने स्वतःहून फोन करून निवृत्तीचा निर्णय कळवला. नागपूरमधील त्या बैठकीनंतर जेव्हा सचिनच्या निवृत्तीच्या बातम्या बाहेर आल्या, तेव्हा संदीप पाटील यांच्यावर प्रचंड टीका झाली होती.
चाहत्यांचा राग त्यांना समजतो कारण सचिन...
एका बातमीचे हेडलाईन 'संदीप पाटील यांनी सचिनला बोल्ड केलं' असं होतं, ज्याची आठवण काढून पाटील आजही हसतात. चाहत्यांचा राग त्यांना समजतो कारण सचिन हा कोट्यवधी लोकांचे दैवत आहे, मात्र निवडकर्ते म्हणून कठोर निर्णय घेणं आवश्यक होते, असं त्यांनी नमूद केलं. शेवटी हा सचिनचा निर्णय होता, असंही ते सांगतात. याच काळात भारतीय क्रिकेटला मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, अश्विन आणि रवींद्र जडेजा यांसारखे स्टार खेळाडू मिळाले, याचे श्रेयही या समितीला जातं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
गौतम गंभीर माझ्याशी बोलत नाही...
दरम्यान, संदीप पाटील यांनी यावेळी एक खुलासा केला. गौतम गंभीरला संघातून वगळल्यापासून त्यानं माझ्याशी यांच्याशी बोलणं कायमचं बंद केलं आहे. शिखर धवनला संघात स्थान मिळाल्यानंतर गंभीरला डच्चू मिळाला होता, तेव्हापासून गंभीरने एकदाही पाटील यांच्याकडे पाहिलेलं नाही. एकाच टीव्ही शोमध्ये असूनही गंभीरने त्यांच्याशी संवाद साधला नाही. गंभीर दर दोन आठवड्यांनी पाटील यांना फोन करायचा, मात्र निवड समितीच्या एका निर्णयामुळे या मैत्रीत कायमचा दुरावा निर्माण झाला, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
