हैदराबादच्या इनिंगच्या पहिल्याच बॉलला अमन रावने शार्दुलला मिड विकेटच्या दिशेने सिक्स मारली, यानंतर दुसऱ्या आणि चौथ्या बॉलला अमनने फोर मारल्या, तर पाचव्या बॉलला अमनने डीप मिड विकेटच्या दिशेने सिक्स हाणली. ओव्हरच्या शेवटच्या बॉललाही शार्दुल ठाकूरने फोर दिली. पहिल्याच ओव्हरमध्ये 24 रन आल्यानंतर शार्दुलने नंतर बॉलिंगच केली नाही.
मुंबईने दिलेलं 132 रनचं आव्हान हैदराबादने 11.5 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पार केलं. अमन रावने 29 बॉलमध्ये नाबाद 49 रन केले तर तन्मय अग्रवालने 40 बॉलमध्ये 75 रनची खेळी केली. मुंबईकडून फक्त तुषार देशपांडेला एकमेव विकेट मिळाली.
advertisement
या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि मुंबईला 18.5 ओव्हरमध्ये 131 रनवर ऑलआऊट केलं. मुंबईकडून यशस्वी जयस्वाल आणि हार्दिक तमोरे यांनी 29-29 रन तर सुयांश शेडगेने 28 रन केले. हैदराबादकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. मिलिंद आणि त्यागराजनला 2-2 विकेट मिळाल्या आणि नितीन साई यादव, मोहम्मद अरफाज अहमद यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
मुंबई शेवटच्या क्रमांकावर
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सुपर लीगच्या ग्रुप बी मध्ये मुंबई शेवटच्या म्हणजेच चौथ्या क्रमांकावर आहे. सुपर लीग स्टेजमधला मुंबईचा हा पहिलाच सामना होता, पण एवढा मोठा पराभव झाल्यामुळे मुंबईचा नेट रनरेट -4.605 झाला आहे. पुढच्या स्टेजला जाण्यासाठी आता मुंबईला उरलेले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. ग्रुप बीमध्ये हैदराबाद आणि हरियाणाने एका सामन्यात एक विजय मिळवला आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यात प्रत्येकी 4-4 पॉईंट्स आहेत. मुंबईप्रमाणेच राजस्थाननेही त्यांचा एक सामना गमावला आहे, पण राजस्थानचा नेट रनरेट मुंबईपेक्षा चांगला असल्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
