आपल्यापैकी अनेक जण सकाळी झोपेतून जागे होताच आधी मोबाईल फोन बघतात. फोनवर बोलल्याशिवाय किंवा फोन हातात घेऊन त्यावर सोशल मीडिया ॲप्स तरी तपासतात. मित्रमैत्रिणींना मेसेज तरी पाठवतात. नाश्ता करताना, चहा पिताना एवढंच कशाला अगदी डॅाक्टरांकडे गेलो तरी मोबाईल कानाला लावून लोक सतत बोलत असतात. पण मोबाईलची स्क्रीन ही अत्यंत दूषित आणि आजारांना निमंत्रण देणारी गोष्ट आहे असं कुणी सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल? नाही ना?, नुकतंच एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.
advertisement
मोबाईलवर साचलेला मळ आणि बॅक्टेरिया यांपेक्षा किती तरी अधिक रोगजंतू आणि जीवाणू या स्क्रीनवर असतात. वारंवार आपण मोबाईल हातात घेतल्यामुळे, तो कानाला पर्यायाने चेहऱ्याला लावल्यामुळे हे रोगजंतू आणि जीवाणू यांनाही आपण चेहऱ्याजवळ नेत असतो.
टाईम्स मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन स्कूल ॲाफ पब्लिक हेल्थमध्ये साथरोग विषयाच्या सहायक प्राध्यापक एमिली मार्टिन म्हणतात की काही गोष्टी उदा. टॅायलेट बाथरुम वापरल्यानंतर सहसा हात धुतल्याशिवाय आपण इतर गोष्टींना स्पर्श करत नाही. पण मोबाईलला मात्र आपण हात लावतो. या सवयींमुळे मोबाईल स्क्रीनवर रोगजंतू आणि जीवाणू आढळण्याचं प्रमाण वाढत आहे.
हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळेच मोबाईल फोन आणि स्वच्छता यांबाबत काही सूचना देण्यात आल्या आहेत.
आपला मोबाईल कधीही बाथरूममध्ये नेऊ नका. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा 60 टक्के पाणी आणि 40 टक्के अल्कोहोल यांच्या मिश्रणातून मोबाईल स्क्रीन स्वच्छ पुसा. हे मिश्रण फोनवर थेट न उडवता एका कापडाचं टोक ओलं करुन त्या कापडाने फोनची स्क्रीन फक्त पुसून घ्या. दिवसातून चार ते पाच वेळा हात धुवूनच मोबाईल हातात घ्या. सार्वजनिक ठिकाणी कुठेही आपला फोन खाली ठेवू नका. रात्री झोपताना बेडवर किंवा चेहऱ्याजवळ फोन ठेवून झोपू नका.