मुंबईजवळ तिसऱ्या विमानतळाची तयारी सुरू
राज्य सरकार विरार आणि पालघर या दोन्ही ठिकाणांचा सखोल अभ्यास करणार आहे. कोणती जागा अधिक सोयीची, वाहतुकीसाठी उपयुक्त आणि दीर्घकालीन विकासासाठी फायदेशीर ठरेल यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. नालासोपारा येथे झालेल्या एका जाहीर सभेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत विचारात घेतले जात आहे.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जर विरारमध्ये विमानतळ उभारले गेले तर तो कोस्टल रोडमार्गे प्रस्तावित वाढवण बंदराशी थेट जोडता येईल. त्यामुळे दळणवळण आणि कनेक्टिव्हिटी अधिक सोपी होईल. दुसरीकडे पालघर येथे विमानतळ उभारण्यात आल्यास वसई-विरार परिसर, विमानतळ आणि बंदर यांच्यातील वाहतूक सुविधा अधिक सक्षम केल्या जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली असून सरकार हा प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पालघर आणि वसई-विरार भागात बंदर, विमानतळ आणि बुलेट ट्रेनसारख्या मोठ्या पायाभूत सुविधा उभारून तिसरी मुंबई विकसित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
दरम्यान नवी मुंबई विमानतळावर सध्या प्रवाशांना मोबाईल नेटवर्कच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. टर्मिनलच्या आत नेटवर्क जवळजवळ नसल्यामुळे कॉल कट होतात, इंटरनेट चालत नाही आणि ॲपद्वारे होणारे पेमेंटही वारंवार अयशस्वी ठरत आहे. त्यामुळे प्रवाशांना संपर्क साधण्यासाठी आणि पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी विमानतळाच्या मोफत वाय-फायवरच अवलंबून राहावे लागत आहे.
