प्रवाशांच्या सोयीसाठी सरकारचा मोठा निर्णय
शुक्रवारी नालासोपाऱ्यात भाजपच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही भव्य सभा नालासोपारा येथील सेंट्रल पार्कमध्ये पार पडली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नालासोपारा आणि वसई-विरार परिसराच्या विकासासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. गेल्या काही वर्षांत नालासोपारा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये येथे मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरासाठी विविध विकास प्रकल्प राबवले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
advertisement
लवकरच उभारले जाणार नवे रेल्वे स्थानक
नालासोपारा रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी अलकापुरी परिसरात नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे, ही या घोषणांमधील महत्त्वाची बाब आहे. सध्या वसई-विरार शहरात साधारण पाच-पाच किलोमीटर अंतरावर रेल्वे स्थानके असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पुढील काळात अडीच-अडीच किलोमीटर अंतरावर नवीन रेल्वे स्थानके उभारली जातील. याची सुरुवात अलकापुरी येथील स्थानकापासून केली जाणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाईल अशी माहिती दिली. स्थानकांवर आधुनिक सोयीसुविधा, स्वयंचलित जिने आणि चांगल्या प्रवासी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या 50-50 टक्के भागीदारीत स्वयंचलित दरवाजे आणि वातानुकूलित डबे असणाऱ्या नवीन लोकल लवकरच सुरू करण्यात येतील. महत्त्वाचे म्हणजे या नव्या लोकल सेवेसाठी द्वितीय श्रेणीच्या तिकिटाच्या दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
