ठाणे शहरामधील काही मुख्य रस्त्यांवर केल्या जाणाऱ्या वाहतूक बदलाच्या पार्श्वभूमीवर 'विकेंडवार' पुन्हा एकदा 'कोंडीवार' ठरण्याची शक्यता आहे. या कामाचा वाहनचालक आणि स्थानिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटातील रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम अद्यापही बाकी आहे. रस्त्याचे काम सध्या सुरू असल्यामुळे काही दिवसांपासून या कामापायी घोडबंदर रोडवरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येत आहे. तसेच हलक्या वाहनांची वाहतूक धीम्या गतीने सुरू राहते.
advertisement
शुक्रवार, 12 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपासून कासारवडवली वाहतूक उपविभाग हद्दीत गायमुख नीरा केंद्र, काजूपाडा ते फाउंटन हॉटेलदरम्यान डीबीएम, मास्टिक पद्धतीने काम केले जाणार आहे. त्यामुळे रविवार, 14 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्याबाबत ठाणे वाहतूक शाखेने अधिसूचना जारी केली आहे. मात्र या बदलामुळे ठाण्यात पुन्हा एकदा कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाशिककडून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना माणकोली नाका येथे प्रवेशबंदी असून नाशिककडून येणारी वाहने माणकोली पुलाखाली उजवे वळण घेऊन अंजूर फाटामार्गे जाणार आहेत.
त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गाला या कोंडीचा फटका बसण्याची भीती आहे. तसेच काही वाहने कापुरबावडी जंक्शन येथून वळवण्यात आल्याने या ठिकाणीही कोंडी झाल्यास शहरातील अंतर्गत रस्ते आणि घोडबंदर रोडवर वाहतूककोंडीची स्थिती निर्माण होऊ शकते. परिणामी शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आणि विकेंड असल्यामुळे शहराबाहेर जाणाऱ्या आणि बाहेरून येणार्या वाहनांना फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना वाय जंक्शन आणि कापुरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ही वाहने वाय जंक्शन येथून थेट नाशिक रोडने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा तसेच कापुरबावडी जंक्शनजवळून उजवीकडे वळण घेऊन कशेळी, अंजुरफाटा या पर्यायी मार्गाने जाण्याचे आदेश वाहतूक शाखेने अधिसुचनेद्वारे दिले आहेत. तर मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडकडे येणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी केली आहे. ही वाहने खारेगाव खाडीब्रिज खालून खारेगाव टोलनाका माणकोली, अंजूरफाटामार्गे इच्छितस्थळी जाणार आहेत.
