बेधडक कारवाई
ठाण्याच्या रेतीबंदर खाडी परिसरामध्ये 22,000 लिटर विषारी केमिकल नेणारा एक टँकर पकडला. खाडीमध्ये या टँकरमधील विषारी केमिकल सोडण्यासाठी चालले होते. त्याचवेळी काही तरूणांनी त्यांना थांबवून पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आला. त्या टँकर ड्रायव्हरच्या संशयास्पद हलचाली पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने ट्रक थांबवून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, टँकर भिवंडीतील वाडा परिसरातून मुंब्रा येथे आला होता. घटनास्थळावरील तरूणांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक रेतींबदरच्या खाडीमध्ये केमिकल सोडण्यासाठी चालला होता. त्याचवेळी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
advertisement
सध्या पोलिसांकडून सर्व आरोपींवर कारवाई केली जात आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि रहिवाशी यांनी आरोप केले की, त्यांचा केमिकल्स समुद्रामध्ये सोडण्याचा हेतू होता. जर त्यांनी केमिकल्स समुद्रामध्ये सोडले असते तर त्यामुळे समुद्री जीवांना आणि नागरिकांनाही त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला असता. घटनेची माहिती मिळताच, मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत त्यांचे वाहन ताब्यात घेतले. त्यांच्यावर एफआयआर नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये रविंद्र गिरी, सद्दाम शाह आणि ड्रायव्हर संदीप गिरी या तिघांचा समावेश आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे आणि निरीक्षक तेजस सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
