
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी : जिल्ह्यातील ढवळपुरी गावात अवकाळी पाऊस आणि प्रचंड गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कलिंगड, कांदा, गहू तसेच जनावरांच्या चाऱ्यासह अनेक पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याची भावना व्यक्त होत आहे. ढवळपुरी गावात अचानक झालेल्या अवकाळी पावसासह जोरदार गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. शेतात तयार झालेली कलिंगडाची पिके अक्षरशः फाटून गेली असून कांदा आणि गव्हाच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.