या दोन्ही घटनांमुळे केवळ मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झालं नाही, तर या अशांत देशांच्या नाजूक राजकीय आणि सामाजिक रचनेवरही खोलवर परिणाम झाला. एकीकडे, इराण गेल्या अनेक दशकांपासून आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि प्रादेशिक तणावांशी झुंजत आहे, तर दुसरीकडे, लेबनॉन राजकीय अस्थिरता आणि आर्थिक संकटाच्या दलदलीत अडकला आहे.
स्फोटांचे कारण निष्काळजीपणा की कटाचा भाग?
advertisement
इराणी अधिकाऱ्यांच्या मते, अब्बास बंदराच्या शाहिद राजाई बंदरात झालेला स्फोट कंटेनरमध्ये साठवलेल्या रसायनांमुळे झाला असावा, असा अंदाज आहे. सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, असे म्हटले जात होतं की, हा स्फोट क्षेपणास्त्र बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या शिपमेंटशी संबंधित असण्याची शक्यता आहे. तथापि, स्फोटाचे अधिकृत कारण अद्याप समोर आलं नाही. स्फोटाच्या कारणाचा तपास सुरू आहे. २०२० मध्ये या बंदरावर इस्रायलने सायबर हल्ला केल्याचा संशय होता. त्यामुळे या ताज्या घटनेमागेही विदेशी देशाचा कट असू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
याउलट, २०२० मध्ये बेरूत बंदरात झालेला स्फोट हा स्पष्टपणे मानवनिर्मित आपत्ती होती. २०१४ मध्ये इराणने एका मालवाहू जहाजातून २,७५० टन अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त केला होता. जप्त करण्यात आलेला हा माल तब्बल सहा वर्षे बंदरात असुरक्षितपणे साठवला होता. या २,७५० टन अमोनियम नायट्रेटला आग लागल्यानंतर बंदरात मोठा स्फोट झाला होता. या निष्काळजीपणामुळे २०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर ७,००० लोक जखमी झाले होते. अंदाजे तीन लाख लोक बेघर झाले. या स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर होती की तो अणु-नसलेल्या स्फोटांमध्ये सर्वात मोठा मानला जातो.
