बुधवारी रात्री पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले होते की, अपहरण झालेल्या सर्वांची सुटका करण्यात आली आहे आणि बीएलएचे 33 अपहरणकर्ते मारले गेले आहेत.
'बचाव मोहिमेत, पाकिस्तानी सैन्याने हवाई दल, फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) आणि स्पेशल सर्व्हिस ग्रुप (एसएसजी) यांच्या सहकार्याने बोलानमध्ये ट्रेनवर हल्ला करणाऱ्या 33 दहशतवाद्यांना निष्क्रिय केले आणि सर्व ओलिसांची सुखरूप सुटका केली, मात्र यामध्ये 21 प्रवाशांचा मृत्यू झाला', असे पाकिस्तान इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने निवेदनात म्हटले.
advertisement
150 हून अधिक नागरिक ओलीस
पाकिस्तानकडून रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्याचं सांगण्यात आल्यानंतर बलुच लिबरेशन आर्मीने लगेचच प्रतिक्रिया दिली. आमच्याकडे अजूनही 150 पाकिस्तानी नागरिक ओलीस आहेत, असं बीएलएकडून सांगण्यात येत आहे. 'ट्रेनमध्ये एकूण 426 प्रवासी होते, त्यातील एकूण 214 लष्करी कर्मचारी होते. ट्रेन अपहरणाच्या पहिल्या तासात 212 प्रवाशांना सोडण्यात आले. आतापर्यंत 40 पाकिस्तानी सैनिक आणि 60 ओलिस धरलेले नागरिक मारले गेले आहेत', असं बीएलएकडून सांगितलं गेलं आहे.
बीएलएने दावा केला आहे की पाकिस्तानने 16 वेळा ओलिस नागरिकांना सोडवण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये 63 पाकिस्तानी सैन्याचे जवान जखमी झाले. बीएलएच्या मते, त्यांच्या ताब्यात अजूनही 154 हून अधिक पाकिस्तानी नागरिक आहेत, ज्यांना त्यांनी ओलीस ठेवले आहे. बीएलएने असेही म्हटले आहे की या काळात त्यांचे तीन सैनिक मारले गेले आहेत.
बीएलएचा पाकिस्तानला इशारा
ट्रेन अपहरणाला 24 तास उलटून गेले आहेत आणि आता आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी फक्त 18 तास उरले आहेत, असा इशारा बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या शाहबाज सरकारला दिला आहे.
190 जणांची सुखरुप सुटका- पाकिस्तान रेडिओ
दरम्यान लष्कराच्या बचाव मोहिमेत 190 जणांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. तर 37 प्रवासी जखमी झाले आणि 57 प्रवाशांना वाचवून क्वेट्टाला नेण्यात आल्याचं वृत्त पाकिस्तान रेडिओने दिलं आहे.
'21 प्रवासी आणि 4 सैनिकांचा मृत्यू'
आयएसपीआरचे महासंचालक अहमद शरीफ चौधरी यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला सांगितले की, 11 मार्च रोजी दुपारी 1 वाजता दहशतवाद्यांनी ट्रेन रुळावरून उतरवली आणि प्रवाशांना ओलीस ठेवले. सुरक्षा दलांनी जलद बचाव मोहीम राबवली आणि सर्व ओलिसांची सुरक्षित सुटका केली. मात्र, या अपघातात 21 प्रवासी आणि 4 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांबद्दलही त्यांनी सांगितले. मृत्यू झालेले निमलष्करी फ्रंटियर कॉर्प्सचा सैनिक आहे. तर बलुच लिबरेशन आर्मीने दावा केला होता की त्यांनी 100 हून अधिक जणांना ठार केलं आहे.
