पंजाबमधील फिरोजपूरमध्ये चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांना २१ दिवसांनी परत आणण्यात भारत सरकारला यश आलं आहे. पण या २१ दिवसांमध्ये पूर्णम शॉ यांच्यासोबत तिथे भयावह घडलं. पाकिस्तानी सैन्याने त्यांना मारहाण केली नाही. परंतु वेगवेगळ्या प्रकारे छळ करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांना अनेक दिवस डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवण्यात आलं. एवढंच नाही तर नीट झोपूही दिलं जात नव्हतं. सैनिकाला वेगवेगळ्या प्रकारे छळ करून त्यांच्याकडून भारतीय गुप्तचर माहिती मिळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला.
advertisement
टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने सरकारी सूत्रांचा हवाला दिलेल्या वृत्तानुसार, पूर्णम कुमार शॉ यांचा शारीरिक छळ करण्यात आला नव्हता तर मानसिक दबावाच्या अनेक पद्धती वापरण्यात आल्या होत्या. यामुळे त्याच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. २३ एप्रिल रोजी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांनी चुकून सीमा ओलांडली. १४ मे रोजी अटारी-वाघा सीमेवरून त्यांची सुटका करण्यात आली. शॉने त्याची पत्नी रजनी यांना सांगितले की, त्याला ताब्यात घेतल्यावर त्याची रात्रभर चौकशी करण्यात आली. पाक रेंजर्सनी वारंवार बीएसएफ तैनाती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांना झोपू दिलं नाही आणि बाथरूममध्ये जाण्यासही मनाई करण्यात आली. अनेक वेळा, त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. त्यांना मानसिकदृष्ट्या तोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले पण आमचा पूर्णम कुमार शॉ हे सुखरूप परतले.
गुन्हेगारासारखी दिली वागणूक
'दात घासण्याची किंवा मूलभूत स्वच्छता राखण्याची परवानगी नव्हती. अशा गोष्टींद्वारे मानसिक स्थिती बिघडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला. अटकेदरम्यान, शॉ यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं. या काळात त्यांना एअरबेसजवळील परिसरात ठेवण्यात आलं होतं. 'शॉ हे पाकिस्तानमध्ये गुप्तहेरासारखा वाटत होते. चौकशीची पद्धत अशी होती की त्यात शाहला गुन्हेगार म्हणून सादर केलं गेलं. सुटकेपासून, शॉ त्याच्या अनुभवांचे आणि अटकेदरम्यान झालेल्या चौकशीचे विश्लेषण करण्यासाठी सतत डीब्रीफिंग करत आहे, अशी माहिती पत्नी रजनी यांनी दिली. शॉ हे मानसिक आघातातून बरे होत आहे आणि त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.
भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे जवान परतला
पूर्णम कुमार शॉ यांच्या सुटकेसाठी भारत सरकार आणि बीएसएफने सतत प्रयत्न केले. त्यांच्या पत्नी रजनी यांनी पंजाब आणि कोलकाता येथील अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही कुटुंबाला पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांचे आभार मानताना रजनी म्हणाल्या, "संपूर्ण देशाचा पाठिंबा माझ्यासोबत होता." भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती, विशेषतः पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता, त्या दरम्यान शॉ यांची सुटका झाली.
