इथे ना गाडी स्लो होण्यासाठी पिवळा सिग्नल लागतो, ना गाडी थांबण्यासाठी लाल सिग्नल, हिरवा सिग्नल लागताच गाड्यांच्या हॉर्नचा आवाज ही नाही. आता हे ऐकल्यावर तुमच्या मनात आलं असेल की भारतातील असं कोणतं शहर असावं जे सिग्नल फ्री आहे? आणि हे कसं शक्य झालं? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
हे शहर आहे राजस्थानातील कोटा, या शहराने या समस्येवर असं समाधान शोधलं आहे, जे देशातील इतर शहरांसाठी प्रेरणादायी ठरतंय.
advertisement
भारताची कोचिंग कॅपिटल म्हणून ओळख असलेलं कोटा आता देशातील पहिलं शहर बनलं आहे जिथं एकही ट्रॅफिक सिग्नल नाही. म्हणजेच संपूर्ण शहरात वाहतूक पूर्णपणे सिग्नलशिवाय चालते!
ही क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचं श्रेय कोटा अर्बन इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट (UIT) ला जातं. संस्थेने शहरी नियोजनात नाविन्यपूर्ण दृष्टीकोन स्वीकारत शहराच्या रस्त्यांचं जाळं नव्याने उभारलं आहे. परस्पर जोडलेल्या रिंग रोड्समुळे वाहनांना गर्दीच्या भागांना वळसा घालून सहजपणे प्रवास करता येतो, त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि ट्रॅफिक जॅम दोन्ही कमी झाले आहेत.
शहरातील महत्त्वाच्या चौकांवर दोन डझनहून अधिक फ्लायओव्हर्स आणि अंडरपासेस बांधण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांची सतत हालचाल सुरू राहते आणि सिग्नलची गरजच भासत नाही. या प्रणालीमुळे इंधनाची बचत, अपघातांची शक्यता कमी होणं आणि वेळेचं व्यवस्थापन या सर्व गोष्टी शक्य झाल्या आहेत.
कोटाने उभारलेलं हे मॉडेल आता देशातील इतर शहरांसाठी आदर्श ठरतंय. लाखो रहिवासी आणि हजारो विद्यार्थ्यांचं शहर असूनही येथे वाहतूक अतिशय सुरळीत चालते. योग्य नियोजन आणि आधुनिक शहरी रचनेच्या मदतीने “सिग्नलशिवाय शहर” असं कोटाचं उदाहरण आता भारतातील शहरी वाहतुकीच्या नव्या युगाची सुरुवात ठरतंय.
