व्हिडिओ व्हायरल झाला
कानपूरच्या जाजमऊ भागातून नुकताच एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक ई-रिक्षा तिच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवाशांनी गच्च भरलेली दिसत आहे. हे दृश्य पाहून कोणालाही धक्का बसेल. नियमानुसार, एका ई-रिक्षात जास्तीत जास्त 5 प्रवासी बसण्याची परवानगी असते, पण या रिक्षात तब्बल 22 लोक होते! यातील 16 जण तर रिक्षाच्या आत दाटीवाटीने बसले होते, तर 6 जण रिक्षाच्या बाहेर अक्षरशः लटकत होते.
advertisement
कानपूरची वाहतूक व्यवस्था चव्हाट्यावर!
ही घटना केवळ वाहतूक नियमांकडे सर्रास होणारे दुर्लक्षच दाखवत नाही, तर कानपूर शहरातील वाहतुकीचा बोजवारा आणि बेशिस्तपणाही चव्हाट्यावर आणते. ई-रिक्षा कानपूरमध्ये वाहतुकीचं एक मुख्य साधन बनली आहे. कमी भाडं आणि सहज उपलब्धतेमुळे ती सामान्य लोकांसाठी पहिली पसंती आहे. तिची लोकप्रियता वाढल्याने ई-रिक्षा चालकांची संख्याही प्रचंड वाढली आहे. पण आता ती वाहतूक व्यवस्थेचा भाग बनण्याऐवजी मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
...म्हणून रिक्षाचालकांची मुजोरी वाढतेय
बऱ्याचदा असे दिसून येते की, जास्त पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी ई-रिक्षा चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवतात. याचा थेट परिणाम म्हणजे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने ई-रिक्षाचा तोल जाऊन ती पलटू शकते आणि रोजच लहान-मोठे अपघात घडतात. दुर्दैवाने, काही वेळा हे अपघात इतके गंभीर असतात की त्यात लोकांचा जीवही जातो. असे प्रकार सर्रास घडत असतानाही, या बेदरकार चालकांवर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही, ज्यामुळे त्यांची मुजोरी आणखीनच वाढत चालली आहे.
महापालिका लागली कामाला
कानपूर महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने ई-रिक्षांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि कठोर उपाययोजना करण्यासाठी अनेकदा घोषणा केल्या आहेत. शहरात ई-रिक्षासाठी विशिष्ट मार्गही निश्चित करण्यात आले आहेत, जेणेकरून मुख्य रस्त्यांवर गर्दी होणार नाही किंवा वाहतूक कोंडी होणार नाही. यासोबतच, ई-रिक्षांवर कर लावण्याची तयारीही सुरू असल्याचे बोलले जाते, जेणेकरून त्यांच्यावर आणखी चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येईल. एवढे सगळे प्रयत्न सुरू असतानाही, शहरात मात्र नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे.
वाहतूक पोलिसांची भूमिका संशयाच्या घेऱ्यात
या सगळ्या प्रकारात कानपूर शहर वाहतूक पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आहे. शहरातील विविध चौकांमध्ये किंवा रस्त्यांवर तैनात असलेले पोलीस कर्मचारी उघडपणे होणारे हे नियमांचे उल्लंघन पाहूनही सर्रास दुर्लक्ष करतात. यामुळेच ई-रिक्षा चालकांना अशी भावना झाली आहे की, आपल्यावर कोणतीही मोठी किंवा कठोर कारवाई होणार नाही. परिणामी, ते कोणताही धाक न बाळगता प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचे प्रकार करत राहतात.
हे ही वाचा : बोंबला! 2000 शेतकऱ्यांना गंडवलं, दिलं होतं दुप्पट पैशांचं आमिष, आता कंपनीच झाली गायब, कोट्यवधींची फसवणूक